Published on
:
27 Sep 2024, 7:06 am
Updated on
:
27 Sep 2024, 7:06 am
दापोडी : कोणत्याही प्रकारची भाजी चटकदार होण्यासाठी लसणाची फोडणी अत्यावश्यक असते. मात्र, हा लसूण महाग झाल्याने फोडणी ही महागली आहे. यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाजारात आवक झाली कमी बाजारात लसणाची आवक मंदावल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम हॉटेल, भोजनालय, खानावळीवर झाला असून, जेवणाच्या ताटातून लसूण हद्दपार झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
यामुळे अनेक महिलांनी सांगितले की लसणाचा ज्या भाज्यांमध्ये उपयोग करावा लागत होता तो उपयोग सध्या बंद करण्यात आला आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांच्या स्वयंपाकात लसूण आणि कांद्याशिवाय भाजीला चव येत नाही. याशिवाय अनेकजण जेवण अधिक चवदार व्हावे, यासाठी लसणाची फोडणी देतात.
लसणाची मागणी कायम असताना आवक कमी झाल्याने बाजारातील दर सगळीकडेच गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लसणाची खरेदी करणे सर्वसामान्य माणसाच्या आवाकाच्या बाहेर झाले आहे. कोणतीही भाजी चवदार बनवण्यासाठी लसणाची खूप गरज आहे. परंतु, लसणाचा दर आवाक्याच्या बाहेर गेल्यामुळे आज लसणाचा वापर करणे हे खूप कठीण बनले आहे.
दोन महिन्यांपासून शेतामध्ये पाऊस काळ सुरू असल्यामुळे लसणाचे उत्पादन झाले नाही. नवीन लसूण बाजारात यायला आणखी दोन-चार महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आणखी दोन महिने लसणाचे बाजारभाव वाढत राहणार असल्यामुळे लसणाचा वापर भाजीमध्ये कसा करावा, यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे.
सध्या मार्केटमध्ये ४०० रुपये किलोने लसूण मिळत असल्याने किरकोळ बाजारात याची विक्री चारशे रुपयांच्या पुढे करावी लागत आहे. त्यामुळे इतर भाज्यांपेक्षा लसणाची काळजी घ्यावी लागते. लसणाचे भाव वाढल्याने ग्राहकांशी कटकट करावी लागते आहे.
उमेश भालेकर, विक्रेते, साई भाजी मार्केट, पिंपळे गुरव
लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे स्वयंपाकात लसणाचा उपयोग करावा की नाही, असा प्रश्न भेडसावत आहे. लसणाचे भाव चारशे रुपयांच्या पुढे गेल्यामुळे सध्या वरण बिगर फोडणीचे केले जात आहे.
छाया बोराडे, गृहिणी, पिंपळे गुरव