Published on
:
27 Sep 2024, 7:02 am
Updated on
:
27 Sep 2024, 7:02 am
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा, राजकीय पक्षांसह प्रशासकीय यंत्रणांसोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी मुंबईत दाखल झाले आहे. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांच्या दौऱ्यात आयोगाकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखा ठरणार आहेत.
शुक्रवारी (२७ सप्टेंबरला) सकाळी १० वाजता राज्यात १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम ठरण्याची शक्यता प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोगाचे अधिकारी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक होईल. दुपारी ३ वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. शनिवारी (२७ सप्टेंबर) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यांतील पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी निवडणूक आयोगाचे पथक चर्चा करणार आहे. नंतर आयोगाचे पथक माध्यमांशी वार्तालाप करणार आहे.