गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कमबॅकPudhari Newsnetwork
Published on
:
27 Sep 2024, 9:04 am
Updated on
:
27 Sep 2024, 9:04 am
श्रीरामपूर / कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा
श्रीरामपूर व कोपरगाव शहरासह दोन्ही तालुक्यांमध्ये दोन-तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळधार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडात पावसाने दमदार हजेरी लावल्याने उभ्या पिकांमध्ये पाणी साठले आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने मोठी आर्थिक हाणी झाली आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने सर्वत्र साधारणतः दीड-दोन तास दमदार हजेरी लावली. यामुळे गोदावरीसह छोट्या मोठ्या नद्या, ओढे व नाल्यांना पूर आल्याने ते ओसंडून वाहत आहेत.
कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये घरात पाणी शिरले तर काही ठिकाणी उभ्या पिकांसह सोंगणी केलेली पिके पाण्यात भिजली आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, कोपरगाव तालुक्यामध्ये ४७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नेहमीप्रमाणे शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही तास खंडित झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची खरीपातील सर्व पिके पाण्यात भिजल्याने चिंता वाढली आहे. वादळामुळे उभा ऊस व मका पिक अक्षरशः भुईसपाट झाले आहे. पूर्व भागात कोकमठाण दहिगाव बोलका मंडळातील वारी येथे एका घराची भिंत पडली. चोंढी नाल्याला पूर आल्याने परसराम बाबा मंदिर परिसरातील बाळासाहेब गोर्डे व गणेश गोर्डे यांच्या वस्तीवरील सर्व घरांसह जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने अन्न धान्यासह कोरड्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नितीन टेके यांच्या शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाचीन पुराच्या पाण्यात भिजली आहे. प्रवीण खैरणार यांच्या घराची भिंत कोसळली आहे. दहिगाव बोलका येथे ६ तर लौकी येथे २० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. येथे २ घरांची पडझड झाली आहे. धोत्रे ४४ घरांमध्ये पाणी शिरले तर ३ घरांची पडझड झाली. खोपडी येथे ७ घरांमध्ये पाणी शिरले तर २ घरांची पडझड, तळेगाव मळे येथे १० घरांमध्ये पाणी शिरले तर २ घरांची पडझड झाली आहे.
रस्त्यावरून वाहिले पाणीच पाणी!
विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या जोरदार पावसांच्या सरींमुळे नदी, नाले, ओढे व अक्षरशः रस्त्यावरून पाणीच पाणी वाहिले. तालुक्याच्या उत्तर- पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. भोकर, खोकर,
मुठेवाडगाव, नाऊर, जाफराबाद, खैरी निमगाव, खानापूर, कमलपूर, भामाठाण, टाकलीभान, वडाळा महादेव, अशोकनगर, निपाणी बडगाव, मातापूरसह अनेक गावांच्या परिसरात पाऊस दमदार बरसला.
'पिकांना पावसाची गरज होती. यामुळे पिकांना फायदा होणार आहे, परंतू सखल भागातील घरांमध्ये परतीच्या पावसाचे पाणी शिरले. यासंदर्भात तत्काळ गाव, मंडळपातळीवरील अधिकाऱ्यांना सूचना देऊन पंचनामे करण्यात आले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात कुठले निर्देश नाहीत, मात्र नुकसान आढळल्यास पंचनामाने करण्यात येतील.
महेश सावंत, तहसीलदार, कोपरगाव,
'वारी परिसरात ४ एकर मका पिक अतिरूष्टीमुळे भुईसपाट झाले. उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्ग कोपामुळे हिरावला आहे. नुकसानीची माय- बाप सरकारने पंचनामा करून आर्थिक भरपाई द्यावी,
गोरख टेके, शेतकरी, वारी, ता. कोपरगाव