शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचा पलटवार
लातूर (Sushma Andhare) : ‘लातूर लोकसभेतील सहाच्या सहा जागा काँग्रेस लढवणार’ या अमित देशमुखांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्षाचे नाही, ते स्थानिकचे नेते आहेत. हेच जर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलले असते तर यावर उत्तर देणं संयुक्तिक होतं, असा पलटवार शिवसेना उपनेत्या (Sushma Andhare) सुषमा अंधारे यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) रविवारी लातूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, महाविकास आघाडीचे जागा वाटपासंदर्भात एकमत आहे. कांही मोजक्या जागावर अजून बोलणं सुरु असून ते लवकरच पूर्ण होईल.
राज्यात सध्या शेतकरी, महिला, युवक असा कोणताही घटक समाधानी नाही, जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी तर मानधनवाढीसाठी आशा, अंगणवाडी सेविका रस्त्यावर आहेत, राज्यात लाखोंच्या संख्येने घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी वेगळे महामंडळ स्थापन करण्याची गरज असल्याचे सांगून राज्यातील सुरक्षेच्या बाबीवर बोलत असताना महिला, मुली सोडा आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तरी सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला.
महायुतीचे सरकार लोकाभिमुख नाही तर मतांसाठी काम करत असून येत्या निवडणूकित जनता धडा शिकवेल. मुंबई विद्यापीठ निकालचा हवाला देत अंधारे यांनी आजही राज्यात शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टी राज्यात जाती धर्माचे काम करत असल्याची टीका केली. यावेळी संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख माजी आ. दिनकर माने, जिल्हा सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, लिंबन महाराज रेशमे, श्रीपाद कुलकर्णी, सुनिल बसपुरे आदींची उपस्थिती होती.
परंपरेने औशाची जागा शिवसेनेची
लातूर जिल्ह्यातील एकूण जागापैकी औसा, निलंगा आणि अहमदपूर या आमच्या जागा आहेत, युतीच्या काळात आम्ही या जागा लढविल्या. आता महाविकास आघाडीसोबत असलो तरी औसा ही आमची पारंपरिक जागा असल्याचे सांगून ती आम्हीच लढणार असल्याचे अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी सांगितले.