अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाली:नागपुरात उद्धव ठाकरेंची तूफान फटकेबाजी, मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा

2 hours ago 1
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. अमित शहा म्हणजे अहमद शहा अब्दाली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले. ते म्हणतात औरंगजेब संघटनेचे प्रमुख उद्धव ठाकरे. मी औरंगजेब तर तुम्ही कोण? तुम्ही तर अहमद शहा अब्दाली, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. पुढे ते म्हणाले, काय नशीब आहे बघा, अमित शहा जिथे येऊन जातात नंतर तिथे मी येऊन यांना फटकारतो. अमित शहा म्हणतात उद्धव ठाकरेला संपवा. हिंमत असेल तर मैदानात या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवून दाखवा, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 25 ते 30 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तेव्हा शिवसेनेची कधी भाजप झाली नाही, मग आता काय म्हणता शिवसेनेची कॉंग्रेस झाली? मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता. तेव्हा जागावाटप अंतिम टप्प्यात आले होते. तेव्हा मला फोन करून सांगतात आपल्याला पुढे सोबत नाही जाता येणार, ही युती तोडावी लागेल. वरून तसे आदेश मिळाले आहेत. मी म्हणले ठीक आहे आणि नंतर तुमच्या साक्षीने निवडणूक लढवून जिंकून दाखवले. भाजपचे हे हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. आम्हाला दळभद्री गोमूत्रधारी हिंदुत्व मान्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथल्या एका महिलेला विचारले कसे चालू आहे, त्यावर त्या म्हणाल्या 1500 रुपयात काय होते? 1500 रुपयांत घर पण चालत नाही. मुलांचे शिक्षण 1500 रुपयात होणार आहेत का? असे म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली आहे. मोदी-शहांची आम्हाला भीक नको आहे, आम्ही हक्काचे मागत आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. पण तेव्हा मी अशा सभा घेत सगळ्यांना दाखवत नाही बसलो की मी कर्जमाफी केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांवर लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या पुतळा कोसळल्याची घटना काही महिन्यापूर्वीच घडली होती. या घटनेनंतर आता चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवलात पुतळ्याच्या निकृष्टतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी या पुतळा दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केला आहे. 'मिंधे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला, अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ना उडत, मग महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता, वाऱ्याने पडला, असा जोरदार निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article