उबाठाच्या आक्रोश मोर्चाला शंभूराज देसाई गटाकडून प्रतिमोर्चाने प्रत्युत्तर:पाटणमध्ये परस्परांमध्ये जोरदार घोषणाबाजी, पोलिसांची दमछाक

2 hours ago 1
शिवसेना झिंदाबाद...उद्धव ठाकरे...झिंदाबाद... हर्षद कदम तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. अशा जोरदार घोषणा देत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या नेतृत्वखाली उबाठा गटाने पाटण शहरात आक्रोश मोर्चा काढला. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई गटाकडूनही प्रतिमोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी व राडा झाला. पोलीस व दोन्ही गटाच्या कार्यकर्तामध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण निवळले. दिवसभर पाटण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाटण तालुक्यात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या काळात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निकृष्ट दर्जाच्या विकास कामांची पोलखोल करण्यासाठी पुराव्यासह याची माहिती शासनाला देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पाटण येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर उबाठा गटाचे शिवसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी येत असतानाच पोलिसांवर दबावतंत्र वापरून हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोप करत हर्षद कदम व ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. पाटण शहरात हे दोन्ही मोर्चे नवीन स्टॅन्ड परिसरात समोरासमोर आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी व आक्रोश करण्यात आला. पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा उबाठा गटाने दिल्या तर शंभुराज देसाई जिंदाबादच्या घोषणा देसाई गटाकडून देण्यात आल्या. याच दरम्यान प्रचंड तणाव लक्षात घेता पोलिसांनी कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवून पोलीस वाहनांच्या सहाय्याने हे दोन्ही मोर्चे रोखण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील कार्यकर्त्यांनी याला छेद देत रस्त्यावर आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. देसाई गटाचा मोर्चा काही काळानंतर शांत झाला त्यानंतर झेंडा चौक येथे उबाठा गटाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या व जाणीवपूर्वक षडयंत्र रचून हा मोर्चा अयशस्वी व्हावा यासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्या दयनीय प्रकाराबाबत सार्वत्रिक निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा लायब्ररी चौक येथे नेण्यात आला त्या ठिकाणी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी बोलताना हर्षद कदम म्हणाले पालकमंत्री ना. देसाई यांची दडपशाही, हुकूमशाही तालुक्यात अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. सर्वसामान्य जनताच नव्हे तर अगदी प्रशासनही या हुकूमशाहीला कंटाळले आहे. त्यांच्या काळात झालेल्या गैरकामांची आम्ही पुराव्यासह माहिती शासनाकडे देणार होतो व यातील दोषींवर कारवाई करा व जर हे आरोप खोटे ठरले तर आम्ही देखील द्याल त्या शिक्षेला पात्र राहू अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही या मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र दुर्दैवाने या दडपशाही वृत्तीने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पालकमंत्र्यांनी हा मोर्चा, जनभावना व लोकशाही चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या विधानसभेत वाट्टेल त्या परिस्थितीत पालकमंत्र्यांना स्थानिक जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्र्यांच्या देसाई गटाकडून येथे आमच्या मोर्चाला आव्हान देण्यासाठी प्रतिमोर्चा काढण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, रवींद्र पाटील आदी मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केले. शहरातील या तणावात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक व राज्य राखीव पोलीस यंत्रणा फार मोठ्या प्रमाणावर येथे सक्रिय होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article