कृऊबासचा भाजी, फळ बाजार चिखलमुक्त होणार:अमरावतीच्या आमसभेचा ठराव मंजूर

3 hours ago 1
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे‌ आणि भाजी बाजाराला चिखलमुक्त करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. शनिवारी पार पडलेल्या आमसभेत या विषयावर शिक्कामोर्तब झाले. येत्या काळात लवकरच आराखडा तयार करुन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल, असे सभापती हरिश मोरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. जुना कॉटन मार्केट या नावाने असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या इमारतीत फळे व भाजीबाजार भरवला जातो. अमरावती जिल्हाच नव्हे तर शेजारचे काही जिल्हे आणि दूरवरुन या ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी येतात. परंतु अपुऱ्या सोयी-सुविधा असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत याठिकाणी चिखल साचतो. त्यामुळे घाणेरडा वास सहन करीत ग्राहकांना चिखलातून वाट काढावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी, अडते, हमाल, मापारी, ग्राहक आणि व्यवसायिक हा त्रास सहन करित आहेत. कृऊबास प्रशासनाला यासंदर्भात वेळोवेळी माहितीही देण्यात येऊन दुरुस्तीची मागणीही करण्यात आली. परंतु अद्यापही तसा मुहूर्त निघाला नाही. दरम्यान शनिवारी आमसभेत पुन्हा या विषयाने डोके वर काढले. उपस्थित सदस्यांनी याबाबत सविस्तर मांडणी केली. त्यामुळे संचालक मंडळाने हा विषय मान्य केला असून फळे व भाजीबाजाराला चिखलमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यामुळे येत्या काळात सदर कामाचा रितसर आराखडा तयार करुन पुढच्या पावसा‌ळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर बांधकाम करण्यासाठी भाजी व फळे विक्रेत्यांना काही काळापुरती पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. त्यासाठी बडनेरा येथील उपबाजार आणि आजू-बाजूच्या परिसरातील जीनांचे मालक यांच्याशी बोलणी सुरु करण्यात आली आहे, असेही मोरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article