Published on
:
27 Sep 2024, 9:26 am
Updated on
:
27 Sep 2024, 9:26 am
आचारसंहिता लागण्यापूर्वी काही आमदारांची महामंडळांच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आणि शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. शिवसेनेतील आमदार कसे वागत आहेत? कोणी कुणाच्या वाटेत काटे कसे पेरले? कुठल्या आमदाराच्या हट्टापोटी मंत्रीपद हुकले, मंत्रीपदासाठी कुणाच्या पत्नीने जीवनप्रवास थांबविण्याची धमकी दिली? ही विस्फोटक माहिती शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी जाहीर करून महायुतीमधील नाराजीनाट्यावरील पडदा उघडला.
गेल्या दोन वर्षांपासून कोट शिवून मंत्रपदाच्या प्रतीक्षेत अनेक आमदार होते. मात्र आजतागायत मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळाली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर अधिकच तीव्र होत राहिले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व कौशल्याने त्या नाराजीवर तोडगा काढत अडीच वर्ष राज्याची धुरा सांभाळलेली आहे. अखेर ही नाराजी इतकी टोकाला गेली की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत शिवसेनेच्या चार नेत्यांची महामंडळांवर वर्णी लावत आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये आनंद अडसूळ, संजय शिरसाट, हेमंत पाटील आणि भरत गोगावले यांच्या महामंडळांच्या अध्यक्षपदी नियुक्त्या झाल्या आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. हिंगोलीचे माजी आमदार तसेच बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.
मंत्रीपदे मिळणार असे सांगणार्या भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. हे अध्यक्षपद स्वीकारण्यास गोगावले यांनी नकार देत शिवसेनेतील अंतर्गत खदखदीला वाट मोकळी करून दिली. मंत्री नाही तर सिडकोचे अध्यक्षपद तरी द्यावे, अशी अपेक्षा गोगावले यांनी व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण झाली नसल्याने रोखठोक बोलण्यास प्रसिद्ध असलेल्या गोगावले यांनी दोन वर्षे मंत्रिमंडळाचा विस्तार का होऊ शकला नाही? मंत्रिपदासाठी कुठल्या आमदाराने ब्लॅकमेल केले होते? राज्याचे मंत्री न झाल्यास आत्महत्या करेन, अशा कोणत्या आमदाराला त्याच्या पत्नीने धमकी दिली होती, याची पोलखोल केली.
हा खळबळजनक दावा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या अंबरनाथ मतदारसंघात झालेल्या महाड, पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिक, मतदारांच्या समोरच महाडचे आमदार गोगावले यांनी करीत ‘संजय’द़ृष्टी असलेल्या त्या आमदाराला लक्ष्य केले. त्यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना देखील मंत्रिपदापासून दूर राहावे लागले, अशी जोड देत एका आमदाराचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी आम्ही मंत्रिपदावर पाणी सोडल्याचे सांगत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. यातून शिवसेनेत काही सारे आलबेल नाही, हे आता लपून राहिलेले नाही.