‘देशासाठी एका घराने किती त्याग करायचा? तुम्ही त्यांच्यावर टीका करता?’, शरद पवार यांचे सवाल

4 hours ago 1

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. “काल पाऊस आला म्हणून पुण्याचा दौरा रद्द केला. मी बापू पठारेंना म्हटलं की, सभा होणार आहे की नाही? ते म्हणाले, पंतप्रधान येवो किवा न येवो आपली सभा होणार. पाऊस आला तरी सभा होणार. त्यानंतर आज तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात. ते म्हणायचे, ४०० च्या खाली येणार नाही. लोकांना वाटायचं की मोदी हैं तो मुमकीन हैं. लोकांना वाटायचं की ४०० जागा येणार”, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची चौकट घालून दिली. देश चौकटीत घालून दिला. मोदींच्या सहकाऱ्यांना हे उद्ध्वस्त करायचं होतं. एक मंत्री होता, म्हणाला की, ४०० जागा आम्हाला पाहिजे. आम्हाला घटना बदलायची आहे. एक महिला भगिनी म्हणाली की, संविधान बदलना हो तो ४०० पार चाहिये. माझ्यासारखे लोक अस्वस्थ होते. घटना बदलण्याचा अधिकार दिला असता तर तुमच्या अधिकारांचं काय? आम्ही लोक एकत्र आलो. केंद्रात आघाडी केली. अनेक पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि ४०० च्या आसपास जाण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला”, असं शरद पवार म्हणाले.

‘फसवाफसवीचे राजकारण करतात’

“पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसला 1 जागा आणि राष्ट्रवादीच्या 4 जागा होत्या. आम्हाला चिंता होती. मात्र मला विश्वास होता. कालच्या लोकसभेत ३१ जागा जिंकल्या. १० जागा लढवल्या आणि ८ जागा निवडून आणल्या. तो बदल महाराष्ट्राच्या निवडणुकीत दाखवायचा आहे. एक देश, एक निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला नाही. याचं कारण स्पष्ट आहे. फसवाफसवीचे राजकारण करतात”, अशी टीका शरद पवारांनी केली.

“काल ते हरयाणात होते, जम्मूत होते. देशाची हिताची जपणूक करणे बोलले असते तर आम्ही कौतुक केलं असतं. महागाई कमी करणं यावर बोलले असते तर कौतुक केलं असतं. असा एक राजकर्ता आहे का त्याने तीन पिढ्या देशासाठी घालवल्या? या नेत्यांचं योगदान नाही का देशासाठी? जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते”, असं शरद पवार म्हणाले.

‘एका घराने किती त्याग करायचा?’

“नेहरू आयुष्याचे १४ वर्ष तुरुंगात होते. कशासाठी? तर देश स्वतंत्र करण्यासाठी. जी व्यक्ती १२ वर्ष तुरूंगात राहते त्यांच्यावर तुम्ही टीका करता? इंदिरा गांधी यांनी काय केलं नाही? पाकिस्तानने मस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळ्यांसोबत दोस्ती करू इच्छितो आणि मात्र आमच्या वाट्याला गेलं तर आम्ही शांत बसणार नाही हे सांगितलं. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एक बांगलादेश केला. ताकद दाखवून दिली”, असं शरद पवार म्हणाले.

“एका घराने किती त्याग करायचा? नेहरू तुरुंगात, राजीव गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधी यांची हत्या झाली. किती त्याग करायचा? त्यांच्यावर तुम्ही टीका करता? आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राज्य आहे. याआधी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचं राज्य होतं. काय केलं यांनी या राज्यात? मी चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्याचा उपयोग राज्याचा चेहरा बदलासाठी करायचा असतो हे आम्ही दाखवलं. मला लोकसभेला तुम्ही निवडून दिलं. देशाचं अन्न आणि शेती याची जबाबदारी माझ्यावर सोपवली”, असं शरद पवार म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article