कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या पोर्शे कारवर मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार कारवाई केली आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) बाजू ऐकल्याशिवाय या अर्जावर कोणतीही कार्यवाही करू नये, अशी मागणी सरकार पक्षाने गुरुवारी न्यायालयात केली. घटनेनंतर पोलिसांनी जप्त केलेली ‘पोर्श’ कार परत मिळण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी केलेल्या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आक्षेप नोंदविले.
‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण- तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन कारचालक मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. त्यावर बाल न्याय मंडळापुढे गुरुवारी सुनावणी झाली. या अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी ‘पोर्श’ कार जप्त केली आहे. ती परत मिळण्यासाठी आरोपी विशाल अगरवालच्या कुटुंबीयांनी अर्ज केला आहे. त्याला सरकार पक्षातर्फे जोरदार विरोध करण्यात आला. या प्रकरणात मोटार वाहन कायदा लागू झाल्याने ‘आरटीओ’ हे पक्षकार असून, त्यांची बाजू ऐकल्याशिवाय कार्यवाही करण्यात येऊ नये, अशी भूमिका विशेष सरकारी वकिलांनी मांडली. याशिवाय, अल्पवयीन मुलाचा पासपोर्ट मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. त्यावर कुटुंबीयांना पोलिसांकडे अर्ज करता येईल, असे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.