प्रणिती शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद वाढणार? सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

2 hours ago 1

सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडणूक लढवेल, अशी भूमिका काल मांडली होती. खासदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेवर माजी आमदार नरसय्या आडम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “कोणत्याही परिस्थितीत मी सोलापूर शहर मध्यमधून उभा राहणार आणि जिंकून येणार. लोकसभा निवडणुकीवेळी माकपचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यात सोलापूर शहर मध्यच्या जागेबाबत दीर्घ चर्चा झाली होती. शहर मध्यची जागा देण्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केले होते”, असा दावा नरसय्या आडम यांनी केला.

“सीताराम येचुरी यांनी सोलापूर मध्यची जागा नरसय्या आडमला सोडण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी सांगितले, शहर मध्य आडम मास्तरसाठी सोडली जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वाट बघणार, अन्यथा प्रसार माध्यमातून आम्ही आमची भूमिका जाहीर करणार”, असा इशारा नरसय्या आडम यांनी दिला.

“कोणत्याही परिस्थितीत आडम मास्तर सोलापूर शहर मध्यमधून उभे राहणार आणि जिंकून येणार. सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. पण तिकीट दिल्लीमध्ये फायनल होणार. सीताराम येचुरी जिवंत असते तर त्यांनीच बोलले असते. मात्र अजूनही आम्ही अपेक्षा सोडली नाही. आमचे हातपाय लुळे नाहीत. अनेकवेळा स्वातंत्र्य निवडणूक लढलो आहोत. आम्ही आमच्या ताकदीवर आमदार झालो. कुणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या”, असं नरसय्या आडम म्हणाले. “काँग्रेस पक्षाने 2004 ला मला पाठिंबा दिला. पण त्यावेळी बंडखोर उभा केला. मी विधानसभेला उभा राहणार आणि विधानसभेत पाय ठेवणार”, असंदेखील नरसय्या आडम म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे यांचा नातू सोलापूर शहर मध्य लढणार?

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा नातू काँग्रेसकडून लढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत नरसय्या आडम यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. “माकपच्या वरिष्ठ नेत्यांचा शहर मध्यवर लक्ष आहे. महाविकास आघाडीचा निर्णय जेव्हा आमच्याविरोधात जाईल त्यावेळेस सोनिया गांधी यांना आमचे शिष्टमंडळ भेटलं. सुशील कुमार शिंदे झालं, त्यांची मुलगी झाली, आता त्यांचा नातू आला. सोलापुरात शिंदे यांचंच राज्य आहे का? सोलापुरात श्रमिकांचे प्रश्न नाहीत का?”, असा सवाल नरसय्या आडम यांनी केला.

“महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला तर दुधात साखर, अन्यथा श्रमिकांची फौज घेऊन मैदानात उतरणार. शिंदे कुटुंबावरचा विश्वास उडाला नाही. त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. शिंदे साहेबांशी बोलणं झालं. त्यांनी मला विचारलं तयारी कशी चालू आहे? मी त्यांना सांगितलं आहे, जोरात तयारी सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया नरसय्या आडम यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article