Published on
:
29 Sep 2024, 9:07 pm
Updated on
:
29 Sep 2024, 9:07 pm
बेळगाव ः कौटुंबिक वादातून आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बोमनाळ (ता. रायबाग) येथे रविवार, दि. 29 रोजी सकाळी ही घटना घडली असून, घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात आली आहे. यल्लव्वा अर्जुन करीहोळे (वय 30), सातव्वा ऊर्फ स्वाती (वय 5) मुत्तप्पा (वय दीड वर्षे, तिघेही रा. बोमनाळ, ता. रायबाग) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी यल्लव्वाचा पती अर्जुन निंगाप्पा करीहोळे, दीर सिद्धाप्पा ऊर्फ अजित निंगाप्पा करीहोळे, सासू शोभा निंगाप्पा करीहोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, यल्लव्वा आणि अर्जुन या दाम्पत्याचा सुखाने संसार सुरू होता. मात्र, दोन अपत्ये झाल्यानंतर लहानसहान कारणावरून अर्जुनने पत्नीला त्रास देऊन छळ चालविला होता. रोजच्या छळाला कंटाळलेल्या यल्लव्वाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान बोमनाळ गावातील मुत्तप्पा करीहोळे यांच्या विहिरीत सातव्वा आणि मुत्तप्पा या दोन चिमुड्यांसह विहिरीत उडी घेऊन तिने जीवनयात्रा संपविली.
घटनेची माहिती समजताच रायबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पती, दिर आणि सासूच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन मुलांसह तिने जीवन का संपविले, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबीक वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.