Published on
:
18 Oct 2024, 3:20 am
Updated on
:
18 Oct 2024, 3:20 am
इस्लामपूर : मारुती पाटील
सणासुदीच्या व लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर वाढतच चालल्याने वधुपित्यांची चिंता वाढू लागली आहे. गेल्या 25 वर्षांत सोन्याच्या दरात तब्बल 19 पट वाढ झाली आहे. सन 2000 साली 4 हजार 400 रुपये प्रती तोळा असलेला सोन्याचा दर आता 80 हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदी सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर निघाली आहे.
दीपावली सणानंतर लग्नसराईचे मुहूर्त सुरू होतात. आपल्या कुवतीप्रमाणे मुलीला लग्नात दागिने घालण्यासाठी वधुपित्याची जुळवाजुळव सुरू असते. मात्र सध्याचे सोन्याचे वाढलेले भरमसाट दर पाहता, सामान्य वधुपित्याला एक - दोन तोळा सोने खरेदी करणेही आवाक्याबाहेरचे झाले आहे. त्यामुळे लग्नात मानपान करताना वधुपित्याला आता तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
सन 2000 मध्ये सोन्याचा दर प्रती तोळा 4 हजार 400 एवढा होता. सन 2005 मध्ये तो सात हजारांवर गेला, तर 2010 मध्ये 18 हजार 500 वर असलेला दर 2015 मध्ये 26 हजार 400, तर 2020 मध्ये 48 हजार 500 वर गेला. त्यानंतर चार वर्षांत तर दराने उसळी घेतली. सध्या 77 हजार असलेला दर दिवाळीपर्यंत 80 हजारांपर्यंत पोहोचेल, असे सांगितले जात आहे.