२००० कोटींचा अंतिम विकास आराखडा मान्यतेसाठी सादर : आ. पाटील Ranajagjitsinha Patil
Published on
:
27 Sep 2024, 10:57 am
Updated on
:
27 Sep 2024, 10:57 am
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : जनतेच्या सूचना लक्षात घेऊन तुळजापूर विकास आर आखड्यामध्ये दोन वेळा बदल करून अंतिम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च असणारा हा विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत लवकरच साकार होईल, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तुळजापूरच्या नागरिकांची महत्वाची सूचना म्हणजे, दर्शन मंडप ही होती, मंदिरालगत नवीन आराखड्यामध्ये दर्शन मंडप होत असून आराधवाडी परिसरात ९८ कोटी रुपये खर्च करून १०८ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवी भवानी तलवार देत आहे असा शिल्प देखावा उभारणार आहे. यामध्ये स्टेनलेस स्टील आणि ब्रांझ याचा उत्तम प्रतीचा उपयोग केला जाणार आहे.
पुतळा सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. ६० कोटी खर्च करून मोठा विस्तीर्ण १००० मीटर बाय २०० मीटर बगीचा साकार करण्यात येत आहे. असे आ. पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी माजी प्र. नगराध्यक्ष सचिन पाटील, युवक नेते विनोद गंगणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांची उपस्थिती होती.
तुळजापूरच्या या विकास कामांमध्ये ९४ कोटी रुपयांचा दर्शन मंडप उभारण्यात येत आहे. त्याच्या शेजारी होणाऱ्या बांधकामासाठी २९ कोटी रुपये खर्च होणार आहे. भाविक सुविधा केंद्र प्रकल्प घाटशीळ परिसरात १०९ कोटी आणि दुसरा प्रकल्प हडको परिसरात १५२ कोटी खर्च करून उभारण्यात येत आहे. शहरामध्ये ४ कोटी रुपये प्रमाणे ४ स्वागत कमानी व महामार्गावर ५ कोटी रुपये किमतीच्या ४ कमानी करण्यात येत आहेत.
स्वागत कमानी अत्यंत देखण्या आणि आलेल्या भाविकांना प्रभावित करतील अशा असतील. ज्याच्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या विकास कामासाठी दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा असून यातील कामासाठी जीएसटी २०० कोटी रुपये व भूसंपादनासाठी दीडशे कोटी रुपये लागणार आहे.
दिव्यांग मार्ग, लिफ्ट होणार
तुळजाभवानी मंदिर अंतर्गत जी विकास कामे होत आहेत त्याचा प्रारंभ घटस्थापनेच्या निमित्ताने व्हावा, असा प्रयत्न आहे. यामध्ये मंदिराच्या परिसरात वयोवृद्धा दिव्यांग यांच्यासाठी स्वतंत्र मार्ग होत आहे. याशिवाय लिफ्ट देखील मंदिरात उभारण्यात येणार आहे. ही विकास कामे राज्य सरकार व मंदिर संस्थान यांच्या निधीतून ५५ कोटी रुपये खर्च करून होत आहेत. विकास कामांचे हे दोन वेगवेगळे टप्पे असल्याचे याप्रसंगी आ. पाटील यांनी सांगितले.