मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाने १२० जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली असून, कोणत्याही क्षणी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांमध्ये यंदा मोठे फेरबदल करण्याचे संकेत भाजपने दिले आहेत. विशेषतः मुंबईतील १६ पैकी १० आमदारांवर टांगती तलवार असल्याचे समजते. त्यापैकी ६ जणांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत १७ जागा लढवून १६ जागांवर यश मिळविले होते. या १६ पैकी ६ आमदारांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. बोरिवलीचे सुनील राणे, दहिसरच्या मनीषा चौधरी, वर्सोवा येथील भारती लव्हेकर, घाटकोपर पश्चिम येथून राम कदम, घाटकोपर पूर्वेतून पराग शहा आणि सायन कोळीवाड्याचे आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. गोरेगाव मतदारसंघाच्या आमदार विद्या ठाकूर यांची उमेदवारीही धोक्यात असल्याचे मानले जाते.
नवे चेहरे देण्याचा प्रयत्न
बोरिवली, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या चार मतदारसंघांत भाजपचे नेटवर्क चांगले आहे. या जागांवर नवे चेहरे देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत आहे. घाटकोपर पश्चिमेतील राम कदम यांच्यावर नेतृत्वाची खप्पामर्जी झाली असली तरी त्यांनी विविध उपक्रमांतून मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला होता. मात्र इथे पक्षातील जुन्या मुंबईत भाजपच्या सहा आमदारांचे पत्ते कट होणार? नेत्याला सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. सायन कोळीवाडा या बहुभाषिक मतदारसंघात तमिळ सेल्वन यांनीही विविध घटकांत चांगले नेटवर्क जमविले होते. तेथून प्रसाद लाड यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरू आहे. त्यांचेही नाव मागे पडले असून माजी नगरसेविका जयश्री शिरवाडकर यांचे नाव चर्चेत आले आहे. वर्सोव्यात भारती लवेकर यांच्या जागी उत्तर भारतीय मोर्चाच्या नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक समीकरणे ठरली प्रभावी
विलेपार्ले, कुलाबा, मलबार हिल या मतदारसंघातही नव्या प्रयोगाची धडपड सुरू होती. मात्र प्रभावी उमेदवार आणि स्थानिक समीकरणांमुळे हे प्रयोग आवरते घ्यावे लागल्याची चर्चा आहे. विलेपार्ले येथे पराग अळवणींविरोधात महिनाभर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. पक्षातील एका उत्तर भारतीय नेत्याला इथे वसविण्याचा घाट स्थानिक समीकरणांमुळे सोडावा लागल्याचे बोलले जात आहे. कुलाब्यातून आमदार राहुल नार्वेकरांसमोर राज्यसभेसह अन्य पर्याय ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. वडाळ्यातून आमदारकीचा विक्रम करणाऱ्या कालिदास कोळंबकरांवरही निवृत्तीची वेळ आणायचा प्रयत्न झाला. मात्र, शिवसेनेतील आपली मुळे अद्याप जिवंत आहेत, ठाकरेंचा रस्ता जवळ करणे अवघड नसल्याचा सिग्नल वडाळ्यातून गेल्याने त्यांची निवृत्ती योजना रहित झाल्याची खमंग चर्चा आहे.