तुळजाभवानी देवीची मानाची पालखी उद्या पाथर्डीत:स्वागताची जय्यत तयारी, शहरातून निघणार मिरवणूक, पालखीला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न

2 hours ago 1
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची पालखी येत्या रविवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी शहरात दाखल होत असून, भाविकांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. कसबा विभागात दर्शन सोहळा होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने मुख्य संयोजक अनिल साठे व अजय साठे यांनी दिली. ते म्हणाले, की कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची पालखी साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ असलेल्या तुळजापूर येथील शारदीय नवरात्रोत्सवात सहभागी होते. मातेची चल मूर्ती गाभाऱ्यातून उचलून पालखीतून सीमोल्लंघन केले जाते. पालखीतून मंदिर प्रदक्षिणा केली जाते. हा सोहळा अतिशय भव्य दिव्य असतो. यावेळी पालखीचे दर्शनासाठी पालखीला स्पर्श करण्यासाठी लाखो भाविक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. ज्यांच्या नशिबी दर्शनाचे भाग्य असते, त्यांचाच हात पालखीला लागू शकतो, असे म्हटले जाते. पालखीतून मिरवणूक झाल्यानंतर मातेची मूर्ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निद्रिस्त अवस्थेत ठेवली जाते. कोजागिरी पौर्णिमेला होमहवन संपन्न होऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता होते. या सोहळ्यासाठी लागणारी पालखी देण्याचा मान जिल्ह्यातील क्षेत्र बालअंबिका (बुऱ्हाणनगर) देवस्थानचे पुजारी भगत परिवाराला आहे. शेकडो वर्षांपासून अनन्यसाधारण महत्त्व असलेली ऐतिहासिक अशी मानाची पालखी देण्याची परंपरा भगत कुटुंब अविरतपणे मोठ्या उत्साहात जोपासत आहे. पूर्वी पालखी जुन्नर तालुक्यात बनवली जात होती. सध्या राहुरी तालुक्यात बनवली जाते. पालखी तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य भगत परिवार संबंधित कारागीराला विशिष्ट मुहूर्तावर देतात. विधिवत पाठपूजा करून पालखी तयार करण्याचे काम सुरू होते. यावेळी विविध मानकरी या कार्यात हातभार लावतात. त्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक साहित्य वापरले जाते. राहुरी ते तुळजापूर दरम्यानच्या प्रवासात पालखी विविध तालुक्यात वाजतगाजत जल्लोषात मिरवली जाते. मोठ्या थाटात भाविक पालखीचे स्वागत करतात. मंडळाच्या सदस्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पालखी मार्ग निश्चित केला. संपूर्ण मार्गावर सडा रांगोळी करून मातेची खणा-नारळाने ओटी भरून औक्षण केले जाते. शहरातील नाईक चौक, वेताळ बाबा मंदिर येथे पालखीचे आगमन होईल. त्यानंतर स्वागत, शृंगार पूजा, आरती होऊन मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यासाठी विविध समित्या कार्यरत झाल्या असून, संपूर्ण शहरवासी पालखीच्या रविवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी सज्ज असल्याचे साठे म्हणाले. गावात देवी येणार असल्याची भावना अनेकांची मनोकामना पूर्ण झाली असल्याने नवसाला पावणारी पालखी म्हणून ख्याती आहे. अशा या सोहळ्याचे आयोजन शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मानाची पालखी शहरात येणार असल्याने सर्व देवी भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. साक्षात तुळजा भवानी सूक्ष्म रूपाने आपल्या गावात मिरवली जाणार असल्याची भाविकांची भावना आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article