पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल:मंत्रालयाला घेराव घालण्याचा दिला इशारा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

5 hours ago 1
मराठा नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी जालना येथील अंतरवाली सराटी येथे 4 दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पुण्यातील मराठा आंदोलकांनी मुंबई गाठली असून आंदोलकांच्या आसपास चेंबूर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या आंदोलकांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असे या आंदोलनाला नाव देण्यात आले आहे. रात्री 9 च्या सुमारास आंदोलकांनी चेंबूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी केली. पुण्यातील सकल मराठा समाजच्या वतीने स्मरण यात्रा काढून मंत्रालयाला घेराव घालून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आंदोलक जमणार आहेत. मनोज जरांगे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावत असून सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पुण्यातील खंडोबा चौकातून या आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने यात्रा सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन याबाबत स्मरण करून देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात वडिगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. ओबीसी समाजाने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा ताणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटीजवळ चोख बंदोबस्त ठेवला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article