मोहटादेवीच्या साक्षीने मशाल पेटवून भाविक पायी गावी:मोहटादेवीच्या पादुकांना स्पर्श करून राज्यातील 10 हजारांहून अधिक मंडळांनी नेली ज्योत

2 hours ago 1
अग्नीत ब्रह्मा-विष्णू-महेशा सह आदिशक्तीचे वास्तव्य असल्याने नवरात्रौत्सवात ज्योत पेटवून अग्निसाक्षीने हा उत्सव साजरा केला जातो. राज्यातील विविध भागातून १० हजारांहून अधिक मंडळे मोहटा देवीच्या साक्षीने मशाल ज्योत पेटवून पायी गावी जाऊन नवरात्रौत्सव साजरा करतात. पाचव्या माळेपर्यंत गावोगावचे भाविक येथून मशाल घेऊन जातात. मोहटा देवस्थानाला तेथील अध्यात्मिक व धर्मशास्त्रीय महत्त्वानुसार भाविकांकडून अर्ध्या पिठाचा दर्जा समजून सेवा केली जाते. सर्व शक्ती बीजाचे मूळ आदिशक्ती पार्वती माता असून सृष्टीच्या कल्याणासाठी देवी सतत तपा चरण करते. संकटकाली त्रिदेवांनीही भगवती मातेची आराधना करीत संकट हरणाची प्रार्थना केली. त्यावेळी देवीने अत्यंत शक्तिशाली अवतार घेत संकट निवारण केले. देवीचे अग्नीरूप सर्वांना दिलासा, मनोबल वाढवणारे समजून अशा अनेक रूपात शिवाचाही सदैव वास असतो. शिवाच्या साक्षीने शक्तीची उपासना म्हणजे ज्योत, मशाल, नंदादीप समजून पूजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही मशाल ज्योतीचे पूजन करीत मावळ्यांना ताकद दिली होती. देवीच्या प्रमुख स्थानांमध्ये अहोरात्र ईश्वर तत्व मुबलक असते. म्हणूनच तेथे गेल्यावर आपोआप मन प्रसन्न होते असे तत्व अंशात्मक रुपात अग्नीमध्ये समाविष्ट करीत त्या ज्योतीमध्ये दैवी शक्ती मानून तेथून ज्योत प्रज्वलित केली जाते. पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली, बीड येथून सर्वाधिक भाविक मोहटा येथून मशाल ज्योत प्रज्वलित करून गावी नेतात. सुमारे ३०० किमीपर्यंतच्या परिसरातून भाविक येऊन देवीचा जयघोष करीत हातात मशाल घेऊन निघतात. रिले पद्धतीने घोडदौड करीत भाविक गावी जातात. येताना मंडळाचे कार्यकर्ते गाडीतून येतात. देवीचे पूजन करून वातीसह मशाल देवीच्या पादुकांना स्पर्श करून ज्योत स्वरूपात येण्याची प्रार्थना करतात. गाभाऱ्यातील पुजाऱ्यांकडून ज्योतीवर ठेवलेला कापूर पेटवून देवीचे नाव घेऊन जय जयकार केला जातो. मंडळाचा एक कार्यकर्ता हातात मशाल घेऊन घोडदौड करीत रस्ता चालतो. सुमारे दोन किमी अंतर एक कार्यकर्ता ज्योत घेऊन धावतो. गाडीतील दुसरा कार्यकर्ता ज्योत हातात घेतो. थकलेला कार्यकर्ता गाडीत बसतो. अखंडपणे ज्योत तेवत राहील याची काळजी घेतली जाते. गावी पोहोचून मंदिरात ज्योतीचे स्वागत व पूजन होते. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अशी ज्योत देवत राहून दररोज पूजा होते. जणू काही मोहटा देवी म्हणजे रेणुका, जगदंबा तेज रूपाने येथे अवतरली अशी श्रद्धा बाळगली जाते. मोहटा देवीचे स्थान माहूरच्या देवीचे अंशात्मक रूप आहे. काही गावांमध्ये मोहटे येथून आलेल्या मशालीच्या ज्योतीने अन्य मशालीचे दिवे पेटवून दिव्यांच्या उजेडातच धार्मिक विधी होतात. मोहटादेवीच्या साक्षीने मशाल पेटवून पायी गावी निघालेले भाविक.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article