जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्याकरीता मोर्चेचांधणीस सुरुवात केली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीसाठी चुरस दिसत आहे. आघाडीचे जागा वाटप झाले असुन युतीचे जागा वाटप अद्याप बाकी आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर उमेदवारांना मित्रपक्षांना सोबत घेत विरोधकांशी दोन हात करतांना दमछाक होणार आहे पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्यास काही ठिकाणी बंडखोर निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
जालना विधानसभा मतदारसंघात युती व आधाडीमधे चुरशीचे वातावरण दिसत आहे. युतीकडुन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व काँग्रेसचे विद्यमान आ. कैलाश गोरंट्याल यांच्यात लद्दत होण्याची शक्यता आहे. वंचीतकडुन डेव्हीड घुमारे यांची उमेदवारी निश्चीत झाल्याचे समजते. मराठा व ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दोन्ही आंदोलनाचा परिणाम पाचही विधानसभा मतदारसंघात कोणासाठी फायद्याचा तर कोणासाठी नुकसानीचा ठरणार हे निवडणुक निकालानंतर समजणार आहे.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात रार्को शरद पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांची उमेदवारी निश्चीत मानली जात आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठाकडुन डॉ. हिकमत उढाण तर भाजपाकडुन सतीश घाटगे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सतीश घाटगे यांनी भाजपाकडुन उमेदवारी मिळाली नाही तरीही निवडणुक लढविणार असल्याचा इशारा दिल्याने घाटगे बंडखोरी करणार का हा प्रश्न युतीसमोर आहे परतुर विधानसभा मतदारसंघात आघाडीच्यावतीने माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या विरुध्द भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर असा सामना होण्याची शक्यता आहे.
मागील पाच वर्षात मतदारसंघात बरेच बदल झाल्याने ही निवडणुक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. भोकरदन मतदारसंघात राकों शरद पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे व भाजपाचे संतोष दानवे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांना भोकरदन विधानसभा मतदारसंघातुन मताधिक्य मिळाले असल्याने चंद्रकांत दानवे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बदनापुर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नारायण कुचे यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवारात लढत होणार असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातुन शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आ. संतोष सांबरे यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत.
वातावरण निर्मिती
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपुर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पक्षीय मेळावे, विकास कामांचे भुमीपुजन, कार्यकर्ता मेळावा याव्दारे संभाव्य उमेदवारांनी निवडणुकीची पेरणी केली आहे.