पिरवाडी समुद्र किनार्यावरील बंधार्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत.Pudhari Photo
Published on
:
04 Oct 2024, 7:13 am
Updated on
:
04 Oct 2024, 7:13 am
उरण : किनार्याची धूप व सुरू असलेली दुरवस्था थांबविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पिरवाडी समुद्र किनार्यावरील बंधार्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत. त्यामुळे बंदिस्ती मधील मोठमोठे दगड समुद्रात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात येणार्या महाकाय समुद्राच्या लाटांमुळे पिरवाडी किनारा पुन्हा उद्धवस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या उरणच्या पिरवाडी किनार्यावरील पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सुट्टीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे या किनार्यावर ओएनजीसी सारखा महत्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प व नागाव मधील लोकवस्ती आहे. मागील अनेक वर्षांत पावसाळ्यात येणार्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे पिरवाडी किनार्यावरील धूप वाढली होती. त्यामुळे येथील नारळी, पोफळीची झाडे उन्मळून निघत होती. त्याचप्रमाणे समुद्राचे पाणी नागाव परिसरात शिरत होते. परिणामी येथील विहिरीतील पिण्याचे पाणी व शेतीत ही समुद्राचे खारे पाणी येऊ लागल्याने समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी पिरवाडी किनार्यावरील बंदिस्ती मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
उरणच्या पिरवाडी किनार्यावर येणार्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी या किनार्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी 30 कोटींचा निधी मंजूर केला आहे. चालण्यासाठी मार्ग, व्यायाम साहित्य, वाहनतळ व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
सार्वजनिक बांधकामच्या किनारा विभागाने या किनार्यावरील मजबूतीसाठी मोठमोठे दगड किनार्यावर टाकून बंदिस्ती केली आहे. मात्र यातील अनेक दगड हळूहळू निखळू लागले आहेत. मोठ्या लाटांमुळे यात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. बंदिस्तीचे दगड निखळू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.