कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या ई-नामद्वारे होणार्या शेतमाल व्यापारातील विक्रीची रक्कम अडत्यांमार्फत थेट ई-पेमेंटद्वारे करण्याची सविधा केंद्र सरकारने आता समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे शेतमालाची ऑनलाइन व्यापार-व्यवहारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.
केंद्र सरकारने देशपातळीवर ‘एक बाजार’ या संकल्पनेवर आधारित ई-नाम ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे कामकाज ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व मोबाईल अॅपद्वारे सुरू आहे. केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत देशातील 1 हजार 389 बाजार समित्या ई-नामला जोडल्या असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 133 बाजार समित्यांचा समावेश आहे. ई-लिलावाद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर, उडीद, कांदा, डाळिंब, कोबी, रेशीमकोष या शेतमालाची प्रामुख्याने विक्री करण्यात येते. शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी 118 बाजार समित्यांमध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.