‘उदे गं अंबे’च्या सेटवर गोंधळाचं आयोजन; संपूर्ण टीमने देवीला घातलं साकडं

2 hours ago 1

'उदे गं अंबे' मालिकेच्या सेटवर पार पडला देवीचा गोंधळImage Credit source: Instagram

‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पौराणिक मालिकेचं नाव ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ असं आहे. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहीत असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरपासून संध्याकाळी 6.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. याच निमित्ताने या मालिकेच्या सेटवर गोंधळाचं आयोजन करुन मालिकेच्या संपूर्ण टीमने देवीला साकडं घातलं आहे.

साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होईल. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा वर्षांनंतर तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागे म्हणाला, “टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. कारण टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखील पोहोचता. स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. जवळपास दहा वर्षांनंतर मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असेल. महादेवांपुढे श्रद्धेने लीन होऊन या नव्या प्रोजेक्टची सुरुवात करतोय. प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम दोन्ही मिळावं हीच अपेक्षा आहे.”

हे सुद्धा वाचा

या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपं साकारणार आहे अभिनेत्री मयुरी कापडणे. मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. योगायोगाने कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच मयुरीला आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठी विचारणा झाली. हा दैवी अनुभव असल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. “मी पहिल्यांदाच पौराणिक मालिकेत काम करतेय. सगळ्यात महत्त्वाचं माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची देवी अंबाबाई, तुळजापुरची देवी भवानी, वणीची देवी सप्तशृंगी, सती, पार्वती ही देवीची वेगवेगळी रुपं मी साकारणार आहे. मी जेव्हा स्वत:ला देवीच्या रुपांमध्ये पाहिलं तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा देवीचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं,” अशी भावना मयुरी कापडणेने व्यक्त केली.

स्टार प्रवाह प्रस्तुत या भव्यदिव्य मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने केली आहे. याप्रसंगी महेश कोठारे म्हणाले, “स्टार प्रवाहसोबत माझे खूप जुने ऋणानुबंध आहेत. मन उधाण वाऱ्याचे ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर विठुमाऊली, दख्खनचा राजा जोतिबा, पिंकीचा विजय असो, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा सुपरहिट मालिका केल्या. उदे गं अबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही.”

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article