काँग्रेसने मुस्लिमांना गृहीत धरू नये:विधानसभा निवडणुकीत विदर्भातील चार जागा देण्याची असिफ कुरैशी यांची मागणी

2 days ago 2
काँग्रेसने मुस्लिमांना गृहीत धरू नये असे सांगतानाच विदर्भात चार जागा देण्याची मागणी काँग्रेसच्या लिगल सेलचे माजी राज्य अध्यक्ष अॅड. असिफ कुरैशी यांनी केली आहे. यामुळे विधिमंडळात मुस्लिमांना पुरेशे प्रतिनिधित्व का मिळत नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी यावेळेस नाही. विदर्भातून एकही मुस्लिम आमदार नाही. २०१९ मध्ये काँग्रेसने फक्त ३ मुस्लिम प्रतिनिधींना उमेदवारी दिली होती. मात्र विदर्भातून एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही. यावेळेस काँग्रेसने विदर्भातूत बाळापूर, मध्य नागपूर, अमरावती आणि अकोला पश्चिम या चार जागा मुस्लिमांना देण्यात याव्या असे ते म्हणाले. लोकसभेत मुस्लिम आणि दलितांनी काँग्रेसला भरघोस मते दिली. हे लक्षात घेता मुस्लिमांना न्याय देण्यात यावा असे अॅड. कुरैशी यांनी सांगितले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता मेरिटच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल असे ते म्हणाले. २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत १० मुस्लिम आमदार होते. दहापैकी ५ मुंबईतील आहे. यामध्ये काँग्रेसचे ३, एमआयएमचे २, समाजवादी पक्ष २, राष्ट्रवादी २ व शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश आहे. अबू आझमी, रईस शेख, अस्लम शेख, अमीन पटेल, झीशान सिद्दीकी, नबाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार, शाह फारूख अन्वर, मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा मुस्लिम आमदारांत समावेश आहे. १९९९ मध्ये, महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मुस्लिम आमदार होते. तेव्हा १३ मुस्लिम आमदार निवडून आले होते. २०१४ मध्ये विधानसभेत काँग्रेसचे ०५, एमआयएम ०२, राष्ट्रवादी ०१, समाजवादी पक्षाचा ०१ असे ९ मुस्लिम आमदार होते. २०१४ मध्ये आमदार असलेले काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान हे २०१९ मध्ये चांदीवली मतदारसंघातून तर एमआयएमचे वारिस पठाण, मालेगाव येथे काँग्रेसचे अासिफ शेख यांना पराभूत व्हावे लागले. विधान परिषदेत एकही मुस्लिम नाही महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सध्या एकही मुस्लिम आमदार नाही. १२ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. त्यावेळी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी नसल्याची बाब समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यातील मुस्लिम नेत्यांना विधानसभा आणि विधान परिषदेवर संधी देऊन मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व वाढवावे अशी विनंतीही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत हे विधान परिषदेतील दोन आमदार निवृत्त झाल्यामुळे विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधींची संख्या शून्य झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article