Published on
:
18 Oct 2024, 2:03 pm
Updated on
:
18 Oct 2024, 2:03 pm
नवी दिल्लीः पुढारी वृत्तसंस्था
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नवीन अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील धोरण, शासन यावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जाईल. या अभ्यास केंद्रात"अखंड भारत" च्या संकल्पनेवरही अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये होणार बदल
शिवाजी महाराजांचे नेतृत्व, शासन, लष्करी रणनीती आणि अविभाजित भारताला आकार देण्यासाठी केलेल्या योगदानाचा शोध घेण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभ्यास केंद्राविषयी माहिती देताना जेएनयूच्या कुलगुरू संतीश्री डी. पंडित म्हणाल्या की, भारतीय ज्ञान प्रणालींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या सुरक्षेचा आणि धोरणात्मक विचारांच्या अभ्यासासाठी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांची नौदल रणनीती, गनिमी कावा आणि त्यांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना यासारख्या क्षेत्रांतील योगदानावरही केंद्र लक्ष केंद्रित करेल, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले गेले आहे, असेही कुलगुरूंनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींचा निधी
या अभ्यास केंद्रासाठी महाराष्ट्र सरकारकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचा वापर केंद्राच्या सुरुवातीच्या संशोधन प्रकल्पांना मदत करण्यासाठी होणार आहे. या केंद्रामार्फत भारतीय धोरणात्मक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल धोरण, भारताची अंतर्गत सुरक्षा, भारताचा सागरी इतिहास, गुप्तचर अभ्यास आणि गुरिल्ला वॉरफेअर (गनिमी कावा) यासह अनेक विशेष अभ्यासक्रमांची मालिका चालवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासातील तज्ञ असलेले महाराष्ट्र सरकारचे तीन व्यक्ती जेएनयु सोबत काम करणार आहेत.
सुरवातीला पदव्युत्तर भविष्यात पीएचडी अभ्यासक्रमही
या केंद्रामध्ये सुरुवातीला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवण्यात येईल, त्यानंतर केंद्राचा विस्तार करताना पीएचडी अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली. शिवाजी महाराजांच्या योगदानाच्या दृष्टीकोनातून भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनांचे सखोल आकलन करणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे. कुलगुरू पंडित यांनी शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक प्रतीक म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषत: महाराष्ट्रातील, सरकारचा सहभाग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिरस्थायी वारसा प्रतिबिंबित करतो. हे लक्षात घेऊन केंद्राने पुढील सत्रात आपले कार्य सुरू करणे अपेक्षित आहे.
केंद्र ठरणार भारताच्या वारशासाठी अभिमानाचा स्त्रोत
या केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्याची, संशोधन, लेख प्रकाशित करण्याची आणि त्याच्या निष्कर्षांवर आधारित पुस्तके विकसित करण्याची योजना आखली जात आहे. संशोधनासाठी प्राथमिक आणि दुय्यम स्रोत गोळा करण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर प्रदेशातील अभिलेखागारांशी सहकार्य करण्याचा केंद्राचा मानस आहे. भारताच्या इतिहासातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे आणि आजही प्रासंगिक राहिलेल्या धोरणात्मक धड्यांचे पुनर्मूल्यांकन करून, छत्रपती शिवाजी महाराज केंद्र हे भारताच्या वारशासाठी अभिमानाचे स्रोत ठरेल, असे कुलगुरूंनी नमूद केले.