जागा वाटपावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला वाद टोकाला गेलाय. ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर तिढा सुटलेला नाही. त्यावरुन राऊतांनी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते सक्षम नाहीत, असा हल्लाबोल केला. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं टोकाची भूमिका स्पष्ट केली की, नाना पटोले जागा वाटपाच्या बैठकीत असतील तर ठाकरेंची शिवसेना बैठकीत जाणार नाही आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठकही होणार नाही.
वाय बी चव्हाण सेंटरला दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक होती. मात्र पटोले बैठकीत नको, अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतल्यानं बैठकच रद्द झाली. विशेष म्हणजे ही बैठक रद्द होण्याआधी महाविकास आघाडीची मतदार यादीवरुन पत्रकार परिषदही झाली. या पत्रकार परिषदेतून राऊतांच्या सक्षम नसलेल्या टीकेला, पटोलेंनी उत्तरही दिलं. पण त्यानंतर जागा वाटपाची बैठक झालीच नाही.
आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाच मातोश्रीवर येणार असून ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. तर तुटेपर्यंत ताणू नका असं उद्धव ठाकरेंनी सूचकपणे म्हटलं आहे. पण वाद नाही मात्र काँग्रेसचं म्हणणं मांडण्यापासून कोणी अडवू शकत नाही, असं पटोले म्हणालेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेससोबत वाद का टोकाला पोहोचला तर विदर्भातल्या जागा. लोकसभा निवडणुकीत, रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेसला सोडली त्यामुळं त्याची भरपाई विधानसभेत पाहिजे, असं थेटपणे संजय राऊत बोलले आहेत. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कोणत्या जागांवर तिढा आहे, तेही पाहुयात…
दक्षिण नागपूर, रामटेक, तुमसर, दर्यापूर आणि सिंदखेडराजा या विदर्भातल्या 5 जागांसह श्रीगोंदा, पारोळा, हिंगोली, मिरज, शिर्डी, गेवराई, उदगीर, कुलाबा भायखळा आणि वर्सोवा या जागांवर तिढा सुटत नाही आहे. या जागांचा तिढा सुटत नसल्यानंच यादी दिल्लीच्या हायकमांडकडे पाठवली असून हायकमांड निर्णय घेईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या आतापर्यंतच्या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हजर राहिलेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख चर्चा करत होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अनिल देसाई बैठकीला हजर राहायचे.
नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळं काँग्रेसकडून जागा वाटपाच्या बैठकीत सहभागी होण्याचा पटोलेंचा पहिला अधिकार आहे. मात्र पटोले बैठकीत नको, अशी ताठर भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलीय. त्यामुळं जागा वाटपाच्या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून ब्रेक लागलाय. पुढं काय होतं, हे दिसलेच.