Published on
:
06 Oct 2024, 6:04 am
Updated on
:
06 Oct 2024, 6:04 am
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर खाडी किनार्याच्या विकासासोबत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या दुसर्या टप्प्यात घोडबंदर खाडी किनारा व घोडबंदर किल्ल्याला जोडणारा काचेचा स्कायवॉक साकारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 100 कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून या कामाला राजच्या नगरविकास विभागाने देखील मंजुरी दिल्याची माहिती आ. प्रताप सरनाईक यांनी दिली.
हा नियोजित काचेचा स्कायवॉक सुमारे 1 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित असून तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. हा काचेचा स्कायवॉक भारतातील पहिला ठरणार असून तत्पूर्वी माळशेज घाटात असा स्कायवॉक प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र त्याच्या कामाची सुरुवात अद्यापही करण्यात आलेली नाही. तत्पूर्वी मिरा-भाईंदरमध्ये पहिला काचेचा स्कायवॉक साकारला जात असल्याने तो सर्वांच्या आश्चर्याचा विषय ठरणार आहे. तसेच या स्कायवॉकवरून चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी केवळ मिरा-भाईंदरच नव्हे तर मुंबईसह आसपासच्या तसेच राज्यातील पर्यटक देखील याठिकाणी भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात घोडबंदर खाडी किनार्याचा विकास वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होत असून त्याचे काम लकवरच सुरु होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात खाडी किनार्यावरून थेट घोडबंदर किल्ल्याला तसेच नियोजित शिवसृष्टीला जोडणारा काचेचा स्कायवॉक साकारला जाणार आहे. त्याची संकल्पना सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. घोडबंदर खाडी किनारा विकासाचे काम ज्याठिकाणी पूर्ण केले जाणार आहे त्या ठिकाणापासून घोडबंदर किल्ल्यावरील उंचावर असलेल्या बुरुजापर्यंत हा स्कायवॉक बांधला जाणार आहे. यामुळे जे पर्यटक खाडी किनार्याला भेट देण्यासाठी येतील त्यांना थेट किल्ल्यात किंवा शिवसृष्टीत जाण्यासाठी काचेचा स्कायवॉक उपयुक्त ठरणार आहे. यामुळे किल्ल्याला अथवा खाडी किनार्याला भेट देण्यासाठी येणार्या पर्यटकांना एकाच दिवशी दोन्ही पर्यटनस्थळे तसेच नियोजित शिवश्रुष्टीला देखील भेट देता येणार आहे. त्यातून त्यांचे येथील पर्यटन पूर्ण होईल.