तिरुपती लाडू वादाची होणार SIT चौकशी, मंदिर शुद्धीकरणासाठी महाशांती होम file photo
Published on
:
23 Sep 2024, 7:01 am
Updated on
:
23 Sep 2024, 7:01 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरुपती बालाजी मंदिराच्या श्रीवरी लाडूत गाय आणि डुकराची चरबी आढळल्यानंतर देशभरातील कोट्यवधी हिंदू भाविकांना धस्स झाले. या प्रकरणाची आता एसआयटी चौकशी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशानुसार, मंदिराच्या शुद्धीकरणासाठी आज (दि.२३) महाशांती होम सुरू करण्यात आला आहे. (Tirupati Laddu controversy)
मंदिराच्या शुद्धतेसाठी तिरुमला येथे शांती होमम पंचगव्य प्रोक्षण म्हणजेच होमचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या शुद्धीकरणासाठी हा होम श्रीवारी (श्री व्यंकटेश्वर) मंदिरातील बंगारू बावी (गोल्डन विहीर) यज्ञशाळेत (विधीस्थळ) सुरू आहे.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात (लाडूत) फिश ऑईल, बीफ टॅलो (गोवंशाची चरबी) आणि लॉर्ड (डुकराची चरबी) आढळून आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आता तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये महानिरीक्षक (IG) किंवा त्याहून अधिक दर्जाचे अधिकारी असतील. एसआयटी चौकशीअंती अहवाल शासनाला सादर केला जाईल. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार याबाबत कठोर कारवाई करणार असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे. (Tirupati Laddu controversy)