उदगाव व जयसिंगपूरमध्ये अशा प्रकारे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.file photo
Published on
:
23 Sep 2024, 8:48 am
Updated on
:
23 Sep 2024, 8:48 am
जयसिंगपूर : मुसळधार पावसामुळे रविवारी मध्यरात्री कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावरील उदगाव येथे ओढ्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने, जयसिंगपूर-उदगाव मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
शिरोळ तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत उसंत घेतलेल्या पावसाने सायंकाळ नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे जयसिंगपूर शहरातून उदगाव येथील कृष्णा नदीला जोडणाऱ्या मुख्य ओढ्याला पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने रविवारी मध्यरात्री सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव टोल नाक्यावर बॅरिकेट लावून वाहतुकीचे नियोजन केले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास वाहत्या पाण्यातूनच मोठी वाहने जात होती. मात्र छोटी वाहने व दुचाकी जात नसल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. जयसिंगपूर-उदगाव मार्गे वाहतूक सुरू असल्याने सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्ग ठप्प झाला आहे.