देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर जनतेला काडीचाही विश्वास नाही:बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अंबादास दानवेंची टीका

5 days ago 3
राष्ट्रवादीचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महायुती सरकारची असून यात मुख्यमंत्री व गृहमंत्री अपयशी ठरले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला आता फडणवीस आणि त्यांच्या गृहखात्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाही. राज्याला खरेच पूर्णवेळ गृहमंत्री आहे का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अंबादास दानवे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राला खरेच पूर्णवेळ गृहमंत्री आहे का? बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी दोन महिने अगोदर मुंबईत येतात, भाड्याने राहतात याचा मागमूस पोलिसांना कसा लागत नाही? या आरोपींना बंदूक दिली जाते तरीही कोणाला खबर कशी मिळत नाही? असे प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केले. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हेर खात्यावर पोलिसांनी पैसे खर्च करणे बंद केले आहे का? सुरक्षा पुरवून पोलिसांनी आपली जबाबदारी संपवली का? असे असेल तर हा हलगर्जीपणा कोणी केला? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केले आहेत. स्वतःला काडतुस-काडतुस म्हणवून घेणाऱ्या गृहमंत्र्यांना आता लोकही फडतूस म्हणू लागले आहेत, असा टोला देखिल अंबादास दानवे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील पक्षफोडीचे मास्टरमाईंड आणि अधून मधून गृहमंत्री असलेल्या या माणसावर आणि त्याच्या खात्यावर सामान्य जनतेला काडीचा विश्वास उरलेला नाही. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील गृहखात्यावर प्रश्न उठवले जात आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देतील का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. बाबा सिद्दिकी यांना सुरक्षा दिलेली असताना देखील असा गोळीबार होतो आणि त्यात त्यांची हत्या होते ही घटना अत्यंत भयंकर आहे. सुरक्षेत असलेल्या नेत्यांची अशी हत्या केली जात असेल तर सुरक्षा नसलेल्या लोकांबद्दल न बोललेलेल बरे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article