धोरणकर्त्यांनी समस्या आहेत, हे आधी मान्य करायला हवे:माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांचे प्रतिपादन

5 days ago 4
कारागृहाच्या आतील आणि कारागृहाच्या बाहेरील समस्यांमध्ये फारसा फरक नाही, हे मला 'आत' गेल्यावर समजले. आपली धोरणे चांगली पण प्रशासकीय अडचणींमुळे अंमलबजावणीत अडचणी येतात. त्यामुळे धोरणकर्त्यांनी आधी 'समस्या' मान्य करणे गरजेचे आहे, असे मत माजी आयपीएस अधिकारी, विधीज्ञ आणि लेखक रवींद्रनाथ पाटील यांनी येथे व्यक्त केले. मनोविकास प्रकाशन आणि विधीज्ञ वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. तुरुंगवास भोगलेल्या भूतपूर्व आयपीएस अधिकाऱ्याची डायरी, अशा स्वरूपाचे रवींद्रनाथ पाटील लिखित पुस्तक 'तुरुंगरंग' या शीर्षकाने रविवारी सकाळी पत्रकार भवन सभागृह, नवी पेठ, येथे प्रकाशित करण्यात आले. न्यायमूर्ती अंबादास जोशी हे या तुरुंगरंग पुस्तकाचे दिशादर्शक आहेत. कच्चे कैदी म्हणून काही काळ तुरुंगात असलेले मात्र, आता सन्माननीय आयुष्य जगणाऱ्या दीपक कदम, खलिद पठाण, व्यंकटेश स्वामी, मुकेश होनखंडे आणि समीर सदावर्ते या पाच जणांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य उमाकांत मिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्तरार्धात लेखक अॅड. रवींद्रनाथ पाटील यांच्याशी माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. विजय पिंगळे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, "तुरुंगरंग पुस्तकाचा नायक तुरुंग हाच आहे. त्या नायकाची गोष्ट या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएस अधिकारी असणारा मी अचानक तुरुंगात कच्चा कैदी म्हणून आलो आणि सराईत गुन्हेगारांमध्ये पोचलो, तेव्हा धक्का बसला. हळूहळू तुरुंग कळू लागला. तिथल्या समस्या लक्षात आल्या. मी तिथे घेतलेले अनुभव डायरी स्वरूपात नोंदवत गेलो. माझ्या लेखनात कुठलीही प्रबोधनाची भूमिका नाही. जे वास्तव पाहिले ते उलगडले आहे. तुरुंगात मला खूप वाचन करण्याची संधी मिळाली. कैद्यांचे संवाद मला अनेक बोलींचे ज्ञान देणारे ठरले. तुरुंगात मी वर्तमानात जगायला शिकलो. भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची चिंता सोडून दिली. वाचनाने मला सकारात्मक ठेवले आणि तुरुंगातील अनुभव मला स्वतः पलीकडे नेणारा ठरला. जगण्यासाठी एक नवा आणि उच्चतम, असा आदर्श पुढे आला. अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभव आणि सोबत धोरणकर्त्यांची मानसिकता, यांची पार्श्वभूमी असल्याने तुरुंग आणि तुरुंगवासी, समजून घेणे शक्य झाले. या कठीण काळात माझ्या कुटुंबातील सर्वांनी दिलेली साथ फार मोलाची होती, असेही ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article