Published on
:
17 Oct 2024, 8:10 am
Updated on
:
17 Oct 2024, 8:10 am
बीड, पुढारी वृत्तसेवा : दिंद्रुड, सिरसाळा आणि बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुटख्याची तस्करी व विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या महारुद्र उर्फ मुळे आबाला बुधवारी (दि.१६) दुपारी ३.३० च्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अटक केली. मागच्या सहा महिन्यांपासून महारुद्र मुळे फरार होता.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना महारुद्र मुळे जमिनीच्या व्यवहारासाठी अंबडला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दराडे यांनी अंवडला धाव घेतली. यावेळी मुळे हा अंबडच्या बसस्थानकातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करताना पोलिसांना दिसून आला. दराडे आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी दिसतात मुळेने हॉटेलमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला या झटापटीत दराडे यांच्या हाताला मोठी दुखापत झाली होती. बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि विक्री करण्यात मुळेचा मोठा सहभाग असल्याचे पोलीस तपासतून समोर आले होते. सिरसाळा येथे गुटख्याचा मोठा साठा सहा महिन्यापूर्वी जप्त करण्यात आला होता. यात मुळे मुख्य आरोपी होता.
त्यानंतर दिंद्रुडमध्ये एक कंटेनरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी ७० लाखांचा गुटखा आणि बीड ग्रामीण पोलिसांनी दीड ते दोन महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईत् ३० लाखांच्या आसपास गुटखा ताब्यात घेतला होता. या तिन्ही प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मागच्या काही काळापासून मुळे बीड जिल्हयातून फरार होता. अखेर त्याला अंबडच्या बसस्थानकातून सपोनि बाळराजे दराडे यांनी ताब्यात घेतले. या कारवाईत सतीश मुंडे, नामदेव सानप, निधार यांचा समावेश होता.
बसस्थानकात उडाली खळबळ
बीड ग्रामीण पोलीस महारुद्र मुळेला अटक करण्यासाठी गेले असता अंबडच्या बसस्थानकात एकच खळबळ उडाली. ग्रामीण पोलिसांना ओळखल्यानंतर मुळेने हॉटेलमधून नाश्ता सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीला ताब्यात घेताना मोठ्याप्रमाणावर आरडाओरड झाली. त्यात पोलिसांच्या कंबरेला बंदूक, अंगावर साधे कपडे आणि एका खाजगी गाडीची चिखलाने झाकलेली नंबर प्लेट असल्यामुळे भरदिवसा वर्दळीच्या बसस्थानकात 'हे कोण? आणि काय प्रकार सुरु आहे ?' म्हणून एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी घडलेल्या प्रकाराची अंबड पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस बसस्थानकात येईपर्यंत आरोपीला घेऊन पोलीस बीडकडे निघाले. त्यामुळे बसस्थानकात अनेक चर्चाना मात्र ऊत आला होता.