मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय

2 hours ago 1

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची गोड बातमी दिली. “आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.

महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो : फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

“हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मराठी भाषामंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

सांस्कृतिक तथा मराठी भाषामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आनंदाचा क्षण आहे. अभिमानाचा क्षण आहे. आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी ३५ वर्षापासूनची आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, तेव्हापासूनची मागणी आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा ३५० सोहळा आपण साजरा केला. आता मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आनंद आणि अभिमान आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आम्ही मोदींच्या अभिनंदनाचा ठराव करू. या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची समिती तयार करून व्याकरण आणि शब्द भंडार वाढवण्याचा प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article