महाआघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' पुस्तकाचे प्रकाशन:पवार, ठाकरे, पटोलेंची एकत्रित पत्रकार परिषद; आचारसंहिता लागण्याआधी सत्ताधाऱ्यांवर बरसले

5 days ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गद्दारांचा पंचनामा नावाने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आरोपपत्राची मविआकडून घोषणा करण्यात आली. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी महायुतीवर टीका करणारी चित्रफित दाखवण्यात आली. आचारसंहिता लागण्यासाधी महाविकास आघाडीचे सरकारवर बरसले. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा, गायकवाड, संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते. काय म्हणाले नाना पटोले? महायुतीच्या गद्दार सरकारचा पंचनामा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम महायुतीने केले आहे. ते पाप जनतेसमोर उघडकीस आणण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असे नाना पटोले म्हणाले. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विरोध केला, त्याच विचाराची लोक सत्तेत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्या लोकांनी राजकोटमध्ये छत्रपतींची प्रतिमा उभारण्याचे काम हाती घेतले आणि काही महिन्यांतच ती प्रतिमा तयार करुन स्थापित केली. अवघ्या आठ महिन्यांत ती प्रतिमा कोसळली. आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचे पाप भ्रष्टाचारी महायुतीने केले आहे. त्यातही माफीमध्ये त्यांनी कंजुसी केली. त्या घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागितली नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला. आज सत्ताधारी पक्षातील नेतेही सुरक्षित नाहीत मुंबईत काल माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कालपर्यंत शाळेत शिकणाऱ्या मुली, राज्यातील महिला तसेच लोक सुरक्षित नाहीत, असे म्हणायचो. आता सत्ताधारी पक्षातील नेतेही सुरक्षित नसल्याचे दिसत आहेत. तर मग राज्यातील जनतेची आज काय स्थिती असेल, हे कालच्या घटनेतून स्पष्ट होत आहे. अनेक लोकांनी त्यांच्याकडे राजीनामा मागितला. पण आता यांचा राजीनामा नाही, तर यांना जनता सत्तेतून उतरवतील, अशी परिस्थिती आहे. स्वत:चे राजकारण आणि राजकारणाच्या पोळ्या कशा शेकता येतील हाच राज्य सरकारचा मानस आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. लोकशाहीचा खून करण्याची पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली राजाच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना असंविधानिक पद्धतीने त्या पदावर बसवले आहे. महाराष्ट्रातील आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दोन-तीन तुकडे झाले असतील, त्यामुळे राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत. रश्मी शुक्लांबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. ते आता काय करतात, हे पहावे लागेल. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर करणे आणि महत्त्वाच्या पदांवर आपल्या विचाराचे अधिकारी बसवायचे आणि लोकशाहीचा खून करायचा, ही पद्धत महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली आहे. रश्मी शुक्ला त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. पीकविमा योजना मुठभर उद्योगपतींसाठी राज्यातील शेतकऱ्यांचे बेहाल आहेत. अतिवृष्टीची कोणतीही शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. कोरोना काळात आम्हाला ते देता आले नाही. कोरोनानंतर ते देण्यासाठी निर्णय झाला होता. पण त्यानंतर खोक्याचे सरकार आले आणि ते प्रोत्साहनपर ५० हजार शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, अशी टीकाही पटोले यांनी केली. मुठभर उद्योगपतींसाठी पीकविमा योजना सुरू केली. काही शेतकऱ्यांना पीकविम्याने ३ रुपये मिळाले, अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले, असा हल्लाबोल पटोले यांनी केला. दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असेही पटोले म्हणाले. पेपरफुटीच्या माध्यमातून मुला-मुलींचे आयुष्य बर्बाद करण्याचे काम महायुती सरकार करत आहे. या सर्व व्यवस्थेला लगाम लावण्यासाठी मविआ म्हणून आम्ही निवडणुकीत जात आहोत. विधानसभा निवडणुकीत जनता आमच्या मागे राहील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. काय म्हणाले उद्धव ठाकरे? गद्दारी केवळ शिवसेना किंवा शरद पवार यांच्याशी झाली नसून महाराष्ट्रासोबत झाली आहे. महाराष्ट्र मोदी-शहा यांच्या गुलामाची वसाहत झाली, अशा पद्धतीने सरकार चालवत करत आहे. आगामी निवडणुकीत हे सरकार घालवावे लागेल. दोन पोलिस कमिशन असणारे मुंबई देशातील एकमेव शहर असेल. लाडक्यांना कमिशनर करा, पण कारभाराचे काय‌? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत. गद्दारांना दिलेली सुरक्षा जनतेसाठी का वापरत नाहीत, असा टोला ठाकरे यांनी लगावला. काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. गृहमंत्री मोठमोठी होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाहीत, अशी टीका ठाकरेंनी फडणवीसांवर केली. गाडीखाली कुत्रे आले तरी राजीनामा मागताल, असे ते उत्तर देतात. तुमच्या राज्यात सर्वसामान्य जनतेच्या जीवाची तुलना कुत्र्याशी करत आहात. तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, असा घणाघात ठाकरे यांनी केला. सिनेतारकांना घेऊन जाहिराती सुरू आहेत, हे सर्व कुणाचे पैसे आहेत. तुम्ही जाहिरातीवर उधळणारा पैसा जनतेच्या सुरक्षेसाठी का लावत नाहीत, असा सवाल ठाकरे यांनी महायुती सरकारला विचारला आहे. निष्क्रीय, भ्रष्टाचारी सरकारबाबत आज गद्दारांचा पंचनामा, आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता या सगळ्याचा न्याय निवाडा करेल, अशी आम्हाला खात्री आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदी-शहांचा होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काय म्हणाले शरद पवार? बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबतची पुरेशी माहिती नाही. पण हा गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल, असे भाष्य आम्ही करणार नाही. याची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. त्यांना सविस्तर माहिती देता येत नाही. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही, असे शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीला फार थोडे दिवस राहिले आहे. दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागू शकते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. निवडणुकीची प्रक्रिया संपल्याशिवाय यांना उत्तर मिळणार नाही. लोकांसमोर जाणे आणि लोकांची सुटका करायची आहे. सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय आहे. त्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी जनतेला केले आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोहरादेवी दौरा आणि त्यांच्या हस्ते झालेल्या ‘बंजारा विरासत’चे उद्घाटनवर भाष्य केले आहे. पंतप्रधान पोहरादेवीला आले आणि बंजारा समाजाबाबत बोलले. बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने काहीच संधी दिली नाही, असे विधान त्यांनी केले. वसंतराव नाईक 11 वर्ष तर सुधाकरराव तीन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मनोहर नाईक मंत्रिमंडळात होते. काँग्रेसने बंजारा समाजाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. बंजारा समाज कृतज्ञता व्यक्त करतो. पण मोदी येऊन चुकीची माहिती देतात. पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. पण त्यांची प्रतिष्ठा राखली जात नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्र सरकारने काही महामंडळे नेमली होती. त्याची उपयुक्तता नाही. त्याचा प्रशासकीय खर्च आहे. काही महामंडळे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा अनुभव नियोजन खात्याने भारताच्या नेतृत्वाला लक्षात आणून दिला आहे. त्यानंतरही रोज नवीन महामंडळ केली जात आहे, त्याला काही अर्थ नाही. ज्या सामाजिक वर्गाचा उल्लेख केला जातो, त्यांच्या मनात नैराश्य येईल असे वाटत आहे, असेही पवार म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article