महाविकास आघाडीच्या 190 जागा फायनल; 98 जागांवरून चर्चेचा खल:दोन दिवसांत अंतिम निर्णय; दसऱ्यापर्यंत जागावाटप

5 hours ago 1
हरियाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. या पार्श्वभूमीवर महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. मविआच्या नेत्यांची सोमवारपासून तीन दिवस अंतिम चर्चेची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. 288 पैकी 190 जागांच्या जागावाटपावर आघाडीत एकमत झाले असून उर्वरित 98 जागांबाबत या तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी दिली. उद्धवसेनेने 125, काँग्रेसने 100 तर शरद पवार गटाची 80 ते 90 जागांवर तयारी पूर्ण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील काही जागांचा तिढा सुटलेला नसल्याने मंगळवारी आणि बुधवारी त्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. मात्र काहीही झाले तरी 12 ऑक्टोबरला दसऱ्यापर्यंत जागावाटप निश्चित होणार असल्याचेही सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाला हव्यात विदर्भात सर्वाधिक जागा विदर्भात 62 जागा आहेत. लोकसभेला इथे चांगले यश मिळाल्याने काँग्रेसला विधानसभेलाही जास्त जागा हव्यात. तिथे त्यांची स्पर्धा ठाकरे गटाशी आहे. मराठवाड्यात हेच चित्र आहे. नागपूर, बुलडाणा, रामटेक, मुंबईतील भायखळा, बोरिवली आदी जागांवर उद्धवसेना आणि काँग्रेसकडून रस्सीखेच सुरू आहे. उद्धवसेनेला हवेत मुंबईतील 36 पैकी 20 मतदारसंघ मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 3 जागा उद्धवसेनेने जिंकल्या, काँग्रेसला एकच जागा मिळाली. त्यामुळे येथील विधानसभेच्या 36 पैकी 20 जागांवर उद्धवसेनेेने दावा केला. ठाण्यातही सर्व 18 जागा त्यांना हव्या आहेत. कल्याण पूर्व व पश्चिम या जागांवर काँग्रेसचा दावा असताना ठाकरेंनी तिथेही दावेदारी केली. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक तरी विधानसभा मतदारसंघ मित्रपक्षांना मिळावा असे प्रयत्न आहेत. समाजवादी पार्टीला मिळणार धुळे-मालेगाव मतदारसंघ समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. 18 ऑक्टोबरला सपाचे नेते, उत्तर प्रदेशातील खासदार अखिलेश यादव राज्यात येत आहेत. मुंबई, नाशिक, मालेगाव, धुळे येते त्यांची सभा होणार आहे. या पक्षाला मालेगाव, धुळे या दोन जागा सोडण्यास मविआचे नेते सकारात्मक असल्याची माहिती आमदार अबू आझमी यांनी दिली. मैत्रीपूर्ण लढतीचीही चाचपणी काही जागांवरचा तिढा सुटत नसल्याने अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या चाचपणीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 2019 च्या विधानसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 10 जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. आता केवळ चाचपणी आल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शाह-शिंदेंची दिल्लीत चर्चा - आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक, लवकरच आचारसंहिता महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटातही चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अजून ते निर्णयापर्यंत आलेले नाहीत. भाजप 155 ते 160 जागा लढवण्यावर ठाम आहे. शिंदेसेनेनेही 100 जागांची मागणी केली, मात्र 80 पेक्षाही एकही जागा कमी घेणार नसल्याचा त्यांचा आग्रह आहे. मग अजित पवार गटाला फक्त 45 ते 50 जागाच उरतात. इतक्या कमी जागा घेण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे चर्चेचे घोडे अडले आहे. नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते, तिथे त्यांची अमित शाह यांच्याशी चर्चा झाली. दसऱ्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत तोडगा काढा, अशा सूचना शाह यांनी शिंदेंना दिल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक शेवटची ठरू शकते. बुधवारनंतर कधीही आचारसंहिता लागेल. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... ओबीसी आरक्षण संपवण्याचा आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कट:लक्ष्मण हाके यांचा दावा; तर जरांगे स्वतःची गादी निर्माण करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट महाराष्ट्रात रचला गेला आहे. आणि या कटामध्ये महाराष्ट्रातले आजी आणि माजी मुख्यमंत्री सामील असल्याचा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आरक्षण बचाव यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके नांदेड येथे दाखल झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. लक्ष्मण हाके यांची सभा देगलूर ते देखील होणार आहे. पूर्ण बातमी वाचा.... नागपूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी:'एकला चलो'च्या धोरणाची तक्रार श्रेष्ठींकडे करणार, अजित पवारांचे पदाधिकारी आक्रमक नागपूर मधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप विषयाची नाराजी चांगलीच वाढली आहे. या संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीत भाजपच्या 'एकला चलो'च्या धोरणाची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे ठरवण्यात आले. आमचा पक्ष हा भाजपच्या दावणीला बांधलेला नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी भाजपवर पलटवार देखील केला आहे. यामुळे आता नागपूर मध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा....

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article