महाविकास आघाडीत फूट?:समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आधीच चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत असणार नाही असे चित्र सध्या दिसत आहे. अखिलेश यादव यांनी शिवाजी नगरमधून अबू आझमी, भिवंडी पूर्वमधून रईस शेख, मालेगावमधून सासने हिंद व भिवंडी पश्चिममधून रियाज आझमी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव शुक्रवारी राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले. नाशिक जिल्ह्यातील मुस्लिमबहुल मालेगाव येथे त्यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली. मुसळधार पावसामुळे सभेत अडचणी आल्या. यावेळी अखिलेश यादव आपल्या भाषणात म्हणाले, “जसे उत्तर प्रदेशने चमत्कार केले आहेत… सर्वांनी मिळून भाजपशी लढा दिला आणि भाजपला असे हरवले ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता… उत्तर प्रदेशच्या जनतेने आम्हाला साथ दिली. जनता त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्या चकमकीच्या आणि बुलडोझरच्या राजकारणाच्या विरोधात… केवळ महागाई आणि बेरोजगारीवर जनतेने प्रश्न विचारू नयेत म्हणून असे केले जात आहेत… म्हणूनच ते द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत... यूपीप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही हे द्वेषाचे राजकारण संपवेल... तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना अखिलेश म्हणाले, “जो पहिले येईल तो पुढे जाईल. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) कडून 12 जागांची सपाची मागणी अगदी योग्य आहे, समाजवादी पार्टी महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकेल. हरियाणाच्या निकालाचा संदर्भ देत अखिलेश यादव म्हणाले, “पराभवानंतर प्रत्येक पक्षाची विचारसरणी बदलते… हरियाणात सर्व काही काँग्रेसच्या बाजूने होते, पण तिथेही भाजपने सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्रात अत्यंत सावध राहून निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सपाने सात जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी दोन विजयी झाले होते. उर्वरित जागांवर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 37 जागा जिंकून भाजप आणि काँग्रेसनंतर सपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. अखिलेश यादव हे कन्नौज, यूपीचे खासदार आहेत. ते आता महाराष्ट्रात संघटना मजबूत करण्यात व्यस्त आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article