येवल्यात जरांगे-भुजबळ समर्थकांमध्ये राडा; मनमाड-नगर मार्गावर रास्ता रोको:जरांगेंनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर दोन्ही समर्थक आमने-सामने

4 days ago 3
येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये रविवारी (दि.१३) रात्री दहाच्या दरम्यान जोरदार राडा झाला. मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आल्यानंतर मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमने-सामने आल्यानंतर वादावादी झाली. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील हे रविवारी येवला दौऱ्यावर होते. येवल्यात आल्यानंतर त्यांनी विंचूर चौफुलीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. नुकत्याच उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी येथे जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. त्यानंतर सभास्थळाच्या दिशेला निघाले. पण यावेळी अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले. त्यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी शिवसृष्टीसमोर ठिय्या मांडला. दरम्यान, आम्ही परतत असताना भुजबळांच्या काही समर्थकांनी शिवाजी महाराजांच्या प्रांगणात जरांगे पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरले, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकाने दिली. पुढील वेळी परिवर्तनासाठी येवल्यात येईल : जरांगे पाटील प्रत्येक व्यासपीठाच्या मर्यादा असतात. त्यामुळे मी आज कुणावरही बोलणार नाही. आज धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन असल्याने मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. पुढील वेळी परिवर्तन करण्यासाठी येणार आहे. परिवर्तनासाठी व योग्य माणसे खुर्चीवर बसवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. दुपारी होणारी सभा रात्री ९.४५ वाजता सुरू झाली. जरांगे पाटील समाजासाठी देत असलेले योगदान पाहता प्रत्येक समाजात असा माणूस पाहिजे, असे मत यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. कावळ्याच्या शापाने गाय कधी मरत नसते भुजबळांचा जरांगे यांना टोला : आता दंड थोपटले आहेत, उलथापालथ केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य नारायण गडावरील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यावर कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते असे उत्तर रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात दिले. ३० कोटी रुपयांच्या शासन निधीतून आपण साकारलेल्या मुक्तिभूमीवर जरांगे दर्शन घेणार असल्याचा आनंद आहे. मी कधीही जातीभेद केला नाही. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत निवडून आलेले ५० टक्क्यांपेक्षा अधिक मराठा समाजाचे आहेत, असे भुजबळ म्हणाले. मनमाड-नगर रस्ता मराठा कार्यकर्त्यांनी रोखला मराठा आंदोलक ठिय्या मांडल्यानंतर प्रचंड आक्रमक झाले. मनमाड- नगर राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर त्यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास रास्ता रोको केला. भुजबळ समर्थकांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी मराठा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article