योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी:अतुलशास्त्री भगरे गुरुजी; ज्योतिर्विदांच्या मेळाव्याचे उद्घाटन

2 hours ago 1
ज्ञान आणि साधनेची भारताला मोठी परंपरा लाभलेली असून योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे मत ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केले. बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळ यांच्यावतीने कै. पंडीत श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आज आयोजित ज्योतिर्विदांच्या मेळाव्याचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून अतुलशास्त्री भगरे गुरुजी बोलत होते. यावेळी सव्यसाची लेखक रघुवीर खटावकर यांना जीवन गौरव पुरस्कार, तर उत्कृष्ट ज्योतिष संस्था पुरस्कार मुंबई येथील अभिजीत प्रतिष्ठान या संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रतिभा शाहू मोडक, ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे, बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष विजय जकातदार आदी मान्यवर उपस्थित होते. अतुलशास्त्री भगरे गुरुजी म्हणाले की, कोणतेही शास्त्र हे अंतिमतः मानव कल्याणासाठीच विकसीत झालेले असते. प्रत्येकालाच भविष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाच्या बळावर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. प्रत्येकाच्याच आयुष्यात चिंता, विवंचना, काळजी, समस्या आणि अडचणी या असतातच. त्या समस्यांवर आपल्या अभ्यासाच्या जोरावर आपण कशा पद्धत्तीने उपाय देऊ शकतो हे प्राधान्याने पाहिले पाहिजे. आपल्याकडे समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीला धीर दिला पाहिजे, तसेच आपण त्याला सुचवलेल्या उपायांचे परिणामही तपासून पाहिले पाहिजे. यावेळी बोलताना राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, आपण पाश्चात्यांच्या गोष्टींचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नसून भारताला लाभलेल्या दीर्घ ज्ञान परंपरांबाबत अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करतील एवढी सखोल विपूल ज्ञाननिर्मिती करून ठेवली आहे. त्या थोर ज्ञानपरंपरेचे पुनर्जीवन करीत आपली वाटचाल असली पाहिजे. सध्याचे युग हे भारताचे असून या युगात जे कोणी ज्या ज्या क्षेत्रात योगदान देतील त्यांना पुढील हजारो वर्षे लक्षात ठेवले जाईल. आज सगळे जग भारताकडे आशेने पाहत असून सगळीकडे इंडियन नॉलेज सिस्टिम विषयी बोलले जात आहेत. भारताला लाभलेल्या दीर्घ ज्ञानपरंपरे बाबत मंथन होऊन आपल्याला लाभलेल्या दीर्घ वारशाबाबत नवीन पिढीला अवगत केले पाहिजे. आज विविध ग्रहांच्या शोधाबाबत पाश्चात्य देश जे वेळोवेळी दावे करतात त्या ग्रहताऱ्यांचा शोध आपल्या पूर्वजांनी या आधीच लावून ठेवला आहे. ज्योतिषशास्त्र हे नित्यनूतन शास्त्र असून आपल्या सनातन संकृतीचा तो पाया आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article