संभाजी ब्रिगेडला MVAत हव्या 25 जागा:ठाकरे गटाकडे मागणी, भानुसे म्हणाले- सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार

2 hours ago 1
संभाजी ब्रिगेडने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडे 25 जागांची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडला सन्मानजनक जागा मिळतील असा शब्दही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. लोकसभेसाठी तीन जागेची मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. परंतू काही तांत्रिक कारणास्तव जागा मिळाल्या नाही. तरी संभाजी ब्रिगेडने राज्यभर केवळ शिवसेनेचेच नाही तर महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी इमाने-इतबारे कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रचंड प्रयत्न केले. आता सन्मानजनक जागा मिळण्याची संभाजी ब्रिगेडला अपेक्षा आहे. जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर वेगळा विचार करू शकतो असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे. यावेळी भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची शिंदे- फडणवीस सरकारने वाट लावली आहे. रस्ते, वीज, पाणी या सुविधांचा अभाव असून, उद्योग व शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, मराठी शाळांचा प्रश्न, महिलांच्या समस्या, आरोग्याचे प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न, युवकांचे प्रश्न गंभीर आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्याचा व देशाचा विकास करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने समविचारी पक्षांशी युती केली आहे. सध्या राज्यात परिवर्तनाची लाट आहे. जनतेच्या हितासाठी संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत (ठाकरे गट) अर्थात महाविकास आघाडी सोबत आहोत. सद्यस्थितीत देशात संविधान धोक्यात असून, हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. या देशाला खोटारडा, अशिक्षित आणि अवैज्ञानिक प्रधानमंत्री मिळाल्यामुळे देशाची वाट लागत आहे. संविधान अर्थात लोकशाही धोक्यात आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीचे, खोक्याचे, दादागिरीचे व दमदाटीचे, केसेस भरण्याचे , घाणेरडे असे राजकारण सुरू असून मुस्कटदाबी सुरू आहे. महागाई, बेकारीने उच्चांक गाठला आहे. देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. हे सर्व रोखण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत अर्थात महाविकास आघाडी सोबत आहोत. पण सन्मानजनक जागा संभाजी ब्रिगेडला मिळाल्या नाही तर आम्ही वेगळा विचार करू शकतो. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गेल्या तीस वर्षा पासून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, वैचारिक, क्षेत्रात संभाजी ब्रिगेड दमदारपणे वाटचाल करीत असून 30 नोव्हेंबर 2016 रोजी संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडने सक्रिय सहभाग नोंदवला असून गेल्या दोन वर्षापासून राज्याच्या राजकारणात संभाजी ब्रिगेडची शिवसेना ठाकरे गटासोबत युती असल्याचेही यात म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article