राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करून समाज, राष्ट्राच्या प्रगतीचे वाहक व्हा:पुरुषोत्तम पाळेकर यांचे मत; राष्ट्रसंतांच्या साहित्याची समाजाला गरज‎

2 hours ago 1
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. इंटरनेट, मोबाइलच्या युगात सर्वांचेच वाचन कमी झाले आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या विपुल साहित्य संपदेत विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा राजमार्ग दाखवला आहे. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक पक्की होण्यास मौलिक मदत होते. महाविद्यालयीन युवकांनी राष्ट्रसंतांच्या ‍विचारांपासून प्रेरणा घेऊन व विचार आत्मसात करून समाज व राष्ट्राच्या प्रगतीचे वाहक व्हावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विश्वस्त प्रमुख व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे माजी अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम पाळेकर यांनी केले. ते राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय अंतर्गत रासेयोच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. या वेळी श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर खारोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत पायमल्ले, सहायक कार्यक्रम अधिकारी मंगेश कोल्हटकर, डॉ. नंदकिशोर काळे, बक्षीस दाते रमेश बोबडे, डॉ. राजेश बोबडे, डॉ. मंगला देशमुख, डॉ. चारुता पार्लेवार, डॉ. जनसेवक जायस्वाल यांची उपस्थिती होती. डॉ. पाळेकर म्हणाले, १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. दादासाहेब काळमेघ यांनी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात वक्तृत्व स्पर्धेचा समावेश असावा, अशी संकल्पना मांडली होती. तेव्हापासून ही स्पर्धा अविरत सुरू आहे. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोट येथील शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे म्हणाले, राष्ट्रसंतांचे साहित्य हे अक्षर वाङ्््मय असून त्यातून युगधर्म म्हणजे काय हे सांगितले आहे. वास्तव परिस्थितीचे भान देणारे साहित्य राष्ट्रसंतांनी लिहिले असल्यामुळे त्यांच्या साहित्याचा अभ्यास युवकांनी करावा. परंतु, त्यासाठी आचरण महत्त्वाचे आहे. आचरणाशिवाय विचारांचे महत्त्व इतरांना सांगता येत नाही. या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम पारितोषिक श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा शिंदे, द्वितीय क्रमांक विवेक नारंगे (यशवंत महाविद्यालय, वर्धा), तृतीय अभय आळशी, चौथे बक्षीस प्रथमेश धायगुडे (केएसी महाविद्यालय, खोपोली) व आदित्य टोळे यांना पाचव्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक व डॉ. जनसेवक जयस्वाल यांच्याकडून ग्रामगीता देण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून अरविंद राठोड व सुषमा सोनारे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहानिका इंगोले व श्रद्धा वाभळे यांनी केले. आजच्या काळात श्रोता मिळणे कठीण : डा. भिसे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे म्हणाले, वक्तृत्व स्पर्धेत हरणे व जिंकणे हा भाग महत्त्वाचा नसून नेतृत्व गुणांच्या विकासासाठी पुण्यतिथी महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यासपीठ लाभणे हीच मोठी बाब आहे. आजच्या काळात वक्ता मिळणे सोपे आहे. परंतु, श्रोता मिळणे कठीण आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article