Published on
:
11 Oct 2024, 2:54 pm
Updated on
:
11 Oct 2024, 2:54 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : OLA CEO Bhavish Aggarwal : वर्क लाईफ बॅलन्सची आधुनिक विचारसरणी योग्य नाही. शनिवार आणि रविवारची सुट्टी ही भारतीय परंपरा नाही. हा पाश्चात्य संस्कृतीचा भाग आहे. पूर्वी आपल्या देशात शनिवार आणि रविवारी सुट्टी नव्हती. आपले कॅलेंडरही वेगळे होते. याच आधारावर सुट्ट्या दिल्या जायच्या, ज्या महिन्यातून एक-दोनच असायच्या. औद्योगिक क्रांतीनंतर शनिवार व रविवारची सुट्टी आपल्या संस्कृतीत आल्या, तथापि, आधुनिक युगात त्याची आवश्यकता नाही. काही दशके मागे वळून पाहिल्यास असे दिसून येईल की, आठवड्यातून 5 दिवस काम करूनही लोक रजा मागत नसत’, असे मत ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मांडले आहे.
भाविश अग्रवाल यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात त्यांनी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने विविध क्षेत्रातील कर्मचारी भडकले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अग्रवाल यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
सध्या अर्न्स्ट अँड यंग इंडिया (EY इंडिया) आणि बजाज फायनान्स सारख्या कंपन्या त्यांच्या कार्य संस्कृतीबद्दल लोकांच्या निशाण्यावर आहेत. EY India कंपनीची कर्मचारी ॲना सेबॅस्टिन पेरायल यांची आई अनिता ऑगस्टिन यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूसाठी कंपनीच्या कामाचा अतिरिक्त दबाव जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी बजाज फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुण सक्सेना यांनी कामाच्या प्रचंड दबावामुळे आपले जीवन संपवले होते. या दोन्ही घटनांमुळे वर्क लाईफ बॅलन्सबद्दल वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या विरोधात बोलत आहेत. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठत आहे.
अग्रवाल यांच्या विरोधात सोशल मीडियावर संताप
ओलाचे सीईओ पाश्चिमात्य भाषा बोलत आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. पाश्चात्य कपडे घाला. पाश्चिमात्य तंत्रज्ञान वापरा. अशा लोकांमुळेच आपला विकास होऊ शकलेला नाही. त्यांना यंत्रमानव हवेत आणि आपण मात्र माणसे कसे राहू अशी मानसिकता अग्रवाल यांच्या सारख्यांची आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘उद्या त्यांना पगारही पाश्चिमात्य सभ्यतेचा भाग म्हणून दिसू लागेल. ते तुम्हाला संध्याकाळी डाळ आणि भाकरी देतील आणि कामाच्या ठिकाणीच इथे चादर पसरवून झोपायला सांगतील. हा ढोंगीपणा आहे.’ एका युजरने म्हटले की क्लायंट पश्चिमेकडील असावेत आणि सुट्टी मागणारे भारतातील असावेत.’