Published on
:
04 Oct 2024, 7:30 am
Updated on
:
04 Oct 2024, 7:30 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्याचे तारणहार असलेले जायकवाडी धरण मागील वर्षी कमी पावसामुळे ओव्हर फ्लो झाले नाही. परंतु यंदा हे धरण नगर, नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातच जायकवाडी ७७ टक्क्यांवर पोहोचले होते. तर ९ सप्टेंबरला धरणाचे ६ दरवाजे ५ इंचाने उमडून विसर्ग सुरू करण्यात आला होता. अजूनही धरणातून विसर्ग सुरूच असून छत्रपती संभाजीनगरला पिण्यासाठी ५ वर्षे पुरेल एवढे म्हणजेच १५ टीएमसी पाणी आतापर्यंत गोदापात्रात सोडण्यात आल्याची माहिती जायकवाडी प्रशासनाकडून देण्यात आली.
यंदा जून, जुलैमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ऑगस्टमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जायकवाडीत वरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर नगर, नाशिकमध्ये पावसाचा जोर महिनाभर कायम राहिल्याने जायकवाडीत मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक झाली.
३० ऑगस्टला जायकवाडीची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर पोहोचली होती. तर ९ सप्टेंबरला धरणाने ९७.९१ टक्क्यांची पातळी गाठताच ६ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू करण्यात आला. त्यानंतर १४ सप्टेंबरला सर्व दरवाजांमधून विसर्ग बंद करून जलसाठा ९९ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला. मात्र वरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढताच पुन्हा २५ सप्टेंबरपासून जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, तो आजूनही कायम आहे.
१४ दिवसांत १५ टीएमसीचा विसर्ग
जायकवाडीतून ९ ते १४ सप्टेंबरदरम्यान पहिल्यांदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र नगर, नाशिकमध्ये पाऊस थांबल्याने जायकवाडीत पाण्याची आवक घटताच धरणातून विसर्ग बंद केला. त्यानंतर पुन्हा २५ सप्टेंबरपासून विसर्ग सुरू असून अजूनही तो कायम आहे. जवळपास १४ दिवसांत १५ टीएमसी पाणी गोदापात्रात वाहून गेले. अर्थात छत्रपती संभाजीनगर शहराला पिण्यासाठी दरवर्षी ३ टीएमसी पाणी लागते. त्यानुसार शहराला ५ वर्षे पुरेल एवढे पाणी वाहून गेले आहे.