शिवसेना, राष्ट्रवादीसोबत नाही तर महाराष्ट्रासोबत गद्दारी:तुम्ही राज्यकर्ते राहायच्या लायकीचे नाहीत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

5 days ago 2
गद्दारी केवळ शिवसेना किंवा शरद पवार यांच्याशी झाली नसून महाराष्ट्रासोबत झाली आहे. महाराष्ट्र मोदी-शहा यांच्या गुलामाची वसाहत झाली, अशा पद्धतीने सरकार चालवत करत आहे. तुम्ही राज्य कारभार चालवायच्या लायकीचे नाही, असा हल्लाबेाल उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केला. मुंबईत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतर्फे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गद्दारांचा पंचनामा नावाने पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुकीत हे सरकार घालवावे लागेल. सर्व बाबतीत बोजवारा उडाला आहे. दोन पोलिस कमिशन असणारे मुंबई देशातील एकमेव शहर असेल. लाडक्यांना कमिशनर करा, पण कारभाराचे काय‌? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते सर्वच असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचे काय, असा सवालही ठाकरे यांनी केला. गद्दारांना, त्यांच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा काढून जनतेसाठी का वापरत नाहीत, असा टोला ठाकरे यांनी लगावला. फडणवीस जबाबदारी घेत नाहीत काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. ते त्यांची मोठमोठी होर्डिंग लावतात, पण कारभाराची जबाबदारी घेत नाहीत, अशी टीका ठाकरेंनी फडणवीसांवर केली. त्यावेळी त्यांचा राजीनामा मागितल्यावर उद्या गाडीखाली कुत्रे आले तरी राजीनामा मागताल, असे उत्तर त्यांनी दिले होते. म्हणजे तुमच्या राज्यात सर्वसामान्य जनतेच्या जीवाची तुलना कुत्र्याशी करत आहात. तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, असा घणाघात ठाकरे यांनी केला. आता जनता न्याय निवाडा करेल सिनेतारकांना घेऊन जाहिराती सुरू आहेत, हे सर्व कुणाचे पैसे आहेत. तुम्ही जाहिरातीवर उधळणारा पैसा जनतेच्या सुरक्षेसाठी का लावत नाहीत, असा सवाल ठाकरे यांनी महायुती सरकारला विचारला आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारात असे अनेक मुद्दे मांडणार आहोत. निष्क्रीय, भ्रष्टाचारी सरकारबाबत आज गद्दारांचा पंचनामा, आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता या सगळ्याचा न्याय निवाडा करेल, अशी आम्हाला खात्री आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मोदी-शहांचा गुलाम होऊ देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article