मतकुणकी (ता. तासगाव) : येथे आपल्या द्राक्षशेतीवर कुर्हाड चालवताना शेतकरी.Pudhari Photo
Published on
:
23 Sep 2024, 1:32 am
Updated on
:
23 Sep 2024, 1:32 am
मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा
लहरी निसर्ग, रोगराई, कर्ज आणि सतत पडणारे द्राक्षाचे भाव यामुळे उत्पादनात होणारे आर्थिक नुकसान याला कंटाळून मतकुणकी (ता. तासगाव) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामचंद्र जाधव यांनी अखेर पाच एकर द्राक्षबाग काढून टाकली. याबाबत सांगताना रामचंद्र जाधव म्हणाले की, आमची गावात दहा एकर द्राक्षबाग होती. यामध्ये सोन्नाक्का, तास ए गणेश, सुपर, थॉमसन वाणांची द्राक्षे उत्पादित केली जात होती. द्राक्षशेतीमधून चांगले उत्पन्न मिळत होते. आर्थिक उत्पन्न सुद्धा चांगले वाढत होते. पण प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. बागेसाठी काढलेले कर्ज भरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. कर्ज काढून बाग पिकवूनही नफा शिल्लक राहत नव्हता. बँकांचा कर्जवसुलीसाठी नेहमीच तगादा असतो. म्हणून नाईलाजास्तव द्राक्षशेतीवर कुर्हाड चालवण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणाले, एकूण क्षेत्रापैकी पाच एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग काढण्याशिवाय पर्याय नव्हता. शासनाने द्राक्षशेती टिकविण्यासाठी ठोस पावले उचलली, तरच द्राक्षशेती टिकेल. दुर्लक्ष केल्यास द्राक्षशेती उद्ध्वस्त होईल. द्राक्ष शेतकर्यांसाठी मदतीचा हात द्यावा. द्राक्षांना हमीभाव दिला तरच भविष्यात द्राक्षशेती करणे शक्य होईल, असेही जाधव यांनी सांगितले.
मागील चार-पाच वर्षापासून द्राक्षशेतीसमोर संकटांची मालिकाच सुरू आहे. निसर्गाचा लहरीपणा, कमी भाव मिळणे, रोगराई, औषधांचे वाढते भाव यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. मात्र द्राक्षशेतीतून लाभ अजिबात नाही. त्यातून कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासनाचे याबाबत धोरण उदासीन आहे. यामुळे द्राक्षबाग काढावी लागली.
- रामचंद्र जाधव, द्राक्ष बागायतदार, मतकुणकी