केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंहPudhari Photo
Published on
:
23 Sep 2024, 2:54 am
Updated on
:
23 Sep 2024, 2:54 am
जम्मू ः वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही पुनर्स्थापित होत असल्यामुळे पाकिस्तानच्या पोटात गोळा आल्याची टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील प्रचारासाठी राजनाथसिंग जम्मू-काश्मीर दौर्यावर आले होते. एका सभेत बोलताना ते म्हणाले की, कलम 370 हटविल्यानंतर लाल चौकात प्रथमच तिरंगा ध्वज दिमाखात फडकत आहे. काश्मीरमध्ये लोकशाही फुलत आहे. त्यामुळे पाकला वेदना होत आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून कलम 370 पुन्हा लागू करण्याबाबत जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. कलम 370 बाबत विरोधक दिशाभूल करीत असून त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्ससारखे पक्ष पाकिस्तानचे एजंट असल्यासारखे वागत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
पीओकेतील जनतेलाही भारतात सामील होण्याची इच्छा
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये प्रगती होत आहे. त्यामुळे पाक व्याप्त काश्मिरातील (पीओके) जनतेलाही आता भारतात सामील होण्याची इच्छा आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अराजकतेला पीओकेतील लोक त्रासले असल्याची टीकाही त्यांनी केली.