10वीच्या योग्यता प्रमाणपत्रांचे अर्ज ऑफलाइनही स्वीकारणार:बोर्डाने मध्येच घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी अडचणीत

3 hours ago 2
सीबीएसई किंवा इतर बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्यक योग्यता प्रमाणपत्राचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याची तयारी म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दर्शविली आहे. मंडळाने मध्येच एक आदेश जारी करुन असे अर्ज केवळ ऑनलाईनच स्वीकारले जातील, असा आदेश जारी केला होता. त्यामुळे आधीच ऑफलाईन अर्ज भरलेल्या शाळा व विद्यार्थी अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसीएशनचे (विज्युक्टा) अध्यक्ष तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधीसभा सदस्य डॉ. अविनाश बोर्डे यांनी पूर्ववत पद्धत सुरु करण्याची मागणी केली होती. राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण न होता सीबीएससी किंवा इतर बोर्डाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन इयत्ता अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाकडून योग्यता म्हणजेच सक्षमता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया पूर्वीपासून ऑफलाइन सुरू होती त्यामुळे या शैक्षणिक क्षेत्राच्या सुरुवातीला अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज भरून घेत त्याचे शुल्क शिक्षण मंडळाकडे जमा केले होते. परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या दिनांक २३ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार २६ ऑगस्टपासून सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज पुन्हा ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाइन स्वीकारले गेले, त्यांचेही अर्ज ऑनलाईन करण्याची वेळ त्या-त्या कनिष्ठ महाविद्यालयांवर ओढवली होती. मुळात सर्व विद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे अर्ज शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच स्वीकारले होते. त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश बोर्डे यांनी या प्रक्रियेला विरोध दर्शवत महाविद्यालयांनी यावर्षी ऑफलाइन घेतलेले अर्ज स्वीकारण्याची विनंती राज्य मंडळाला केली होती. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने एका परिपत्रकाद्वारे ऑफलाइन अर्ज व ऑनलाईन अर्ज या दोन्ही पद्धतीने स्वीकारण्याची परवानगी दिली असून ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत पंधरा दिवसांनी वाढवून १५ ऑक्टोबर केली आहे. त्यांना शुल्क परत मिळणार म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची घोषणा केल्यामुळे अनेकांनी दुसऱ्यांदा अर्ज दाखल केला. शाळेच्या माध्यमातून त्यांनी ऑफलाईन अर्ज आधीच दाखल केले होते. परंतु मंडळाच्या नव्या निर्णयामुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवली होती. दरम्यान अशा सर्व विद्यार्थ्यांना एकवेळचे शुल्क परत केले जाणार आहे. बोर्डे यांनी आपल्या मागणीत हाही मुद्दा नोंदवला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article