Published on
:
07 Oct 2024, 3:53 am
Updated on
:
07 Oct 2024, 3:53 am
मुंबई : महिला नेतृत्वाला वाव देण्यासाठी राज्यात काँग्रेसकडून शक्ती अभियान राबविले जाणार आहे. राजकारणातील महिला सशक्तिकरणासाठी इंदिरा गांधी फेलोशिपअंतर्गत हे 'शक्ती अभियान' राबविले जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
टिळक भवन येथे शक्ती अभियानाच्या शुभारंभानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशातील विविध राज्यांत शक्ती अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदेश काँग्रेसदेखील हे अभियान मोठ्या ताकदीने राबवणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर हे अभियान राबविले जाणार आहे. महिला नेतृत्व पुढे आले पाहिजे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक आणले होते तेव्हा भाजपाने त्याला विरोध केला होता. पण, मोदी सरकारने जेव्हा ते विधेयक पुन्हा आणल्यावर काँग्रेसने मात्र त्याला पाठिंबा दिला. मोदी सरकारने विधेयक मंजूर केले, तर आरक्षणाची अंमलबाजवणी केली नाही. कधी करणार हेसुद्धा सांगितले नाही. काँग्रेस पक्ष मात्र सरकार आल्याबरोबर महिला आरक्षणाची अंमलबजावणी करेल, असे नाना पटोले म्हणाले.