Published on
:
07 Oct 2024, 6:15 am
Updated on
:
07 Oct 2024, 6:15 am
गणेश खळदकर
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात दरवर्षी आरटीईचे सर्वाधिक प्रवेश होतात. यंदा 970 शाळांमध्ये आरटीईच्या 17 हजार 588 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 48 हजार 155 अर्ज आले. त्यामुळे पहिली यादी आणि तीन प्रतीक्षा यादी मिळून पुणे जिल्ह्यात तब्बल 13 हजार 667 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
दरम्यान, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा राज्यात 78 हजार 398 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशासाठी यंदा प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे एक नियमित फेरी आणि तीन फेर्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आल्या. तरीदेखील 26 हजार 840 जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यामध्ये पहिल्या यादीत 16 हजार 337 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी 10 हजार 405 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. पहिल्या प्रतीक्षा यादीत 4 हजार 672 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी 2 हजार 291 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसर्या प्रतीक्षा यादीत 1 हजार 604 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी 714 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तिसर्या प्रतीक्षा यादीत 584 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी 257 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवण्यात येते. यामध्ये आर्थिक वंचित आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये उपलब्ध जागांच्या 25 टक्के जागांवर मोफत प्रवेशाची संधी देण्यात येते. संबंधित इंग्रजी शाळांचे शुल्क शासनाद्वारे आरटीई शुल्कप्रतीपूर्तीच्या माध्यमातून संबंधित शाळांना देण्यात येत असते.
यंदा राज्यातील 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 238 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी 2 लाख 42 हजार 516 पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले होते. या अर्जांतून पहिल्या नियमित यादीमध्ये 93 हजार 9 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यातील 60 हजार 989 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यासाठी सुरुवातीला 23 ते 31 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन वेळा फेरी राबविण्यात आली. या फेर्यांमध्ये देखील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी यावर्षीची आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर संपली असल्याचे जाहीर केले आहे.