Hingoli Assembly election: जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू; मतदार नोंदणीसाठी 29 ऑक्टोबरपर्यंत संधी

2 hours ago 1

20 नोव्हेंबरला मतदान तर 23 ला मतमोजणी: जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (Hingoli Assembly election) : जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 15 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सुमारे 9 लाख 74 हजार 541 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

जिल्ह्यात 1 हजार 15 मतदान केंद्र, 9 लाख 74 हजार 541 मतदार

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त‌ प्रमाणावर मतदान करून घेण्याचे प्रयत्न आहेत. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नाही तर मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी 29 ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्रावर किंवा ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.

निवडणूक कार्यक्रम : जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील निवडणूक (Hingoli Assembly election) कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवार दि. 29 ऑक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 9 लाख 74 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार: दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनंतर निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 15 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील मतदारांची संख्या 9 लक्ष 74 हजार 541 असून, यामध्ये पुरुष मतदार 5 लक्ष 06 हजार 155, महिला मतदार 4 लक्ष 68 हजार 376 तर तृतीयपंथी मतदार 10 आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : 92-वसमत विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 63 हजार 613, महिला मतदार 1 लक्ष 53 हजार 872 तर तृतीयपंथी 6 असे एकूण 3 लक्ष 17 हजार 491 मतदार आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 70 हजार 235, महिला मतदार 1 लक्ष 56 हजार 449 तर तृतीयपंथी 02 असे एकूण 3 लक्ष 26 हजार 686 मतदार आहेत. 94- हिंगोली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 72 हजार 307, महिला मतदार 1 लक्ष 58 हजार 55 तर तृतीयपंथी 2 असे एकूण 3 लक्ष 30 हजार 364 मतदार आहेत.

जिल्ह्यात 1 हजार 15 मतदान केंद्र : जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून, 1015 मतदान केंद्र आहेत. यामध्ये वसमत येथे 327, कळमनुरी येथे 345 तर हिंगोली येथे 343 असे एकूण 1015 मतदान केंद्र आहेत.

जिल्हा सीमेवर विशेष दक्षता : जिल्हा सीमेवरील चेकपोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सीमेवर उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलीस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष : सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले.

मतदारांनो, व्होटर हेल्पलाईन ॲपवर नाव शोधा : व्होटर हेल्पलाईन ॲपवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यावेळी म्हणाले.

दिव्यांग व वयोवृद्धासाठी गृहभेटी मतदान : दिव्यांग व 85 पेक्षा जास्त वयोमानातील मतदारांना निवडणुकीमध्ये मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने गृहभेटी मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना घरपोच मतदान करणे सोईचे होण्यासाठी व योग्य सोईसुविधा उपलब्ध करुन देणेसाठी सर्व समावेशक सूचना विधानसभा स्तरावर देण्यात आलेल्या आहेत.

आचार संहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या (Hingoli Assembly election) सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाण जसे रेल्वे स्टेशन, बसस्टॅंड, रेल्वेपुल, रस्ते, शासकीय बसेस, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती यावर असलेले राजकीय पक्षाचे व जाहिरात स्वरुपाचे पोस्टर, बॅनर, होर्डिंग, झेंडे 48 तासांच्या आत काढून टाकण्याच्या सूचना निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक), एफएसटी, व्हीडीओ टीम, दारु, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध, अंमली पदार्थाच्या वाहतुकीसंदर्भात भरारी पथक तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 14 नाके तयार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाने (Hingoli Assembly election) मतदारांच्या सुविधेसाठी विविध मोबाईल ॲप सुरु केलेल आहेत. यात इनकोअर, सुविधाॲप, सक्षम ॲप, सि-व्हीजील, इ-एसएमएस ॲपचा समावेश आहे. वरील सर्व ॲप हे मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक व भयमुक्त निवडणूक पार पाडण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात मतदार सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून, 1950 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article