virat kohli ind vs prohibition trial cricketImage Credit source: bangladesh cricket x account
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 27 सप्टेंबरपासून कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये दुसरा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा चौथ्या दिवशी 280 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकून बांगलादेशला क्लिन स्वीप करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेश नजमूल हुसैन शांतोच्या नेतृत्वात टीम इंडिया विरुद्ध 2 हात करणार आहे. तर रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा आहे. या दुसऱ्या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांची कसोटी क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया वरचढ
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 14 सामने सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 14 पैकी 12 सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला आहे. तर 2 सामने अनिर्णित सोडवले आहेत. तर अद्याप बांगलादेशला एकदाही जिंकता आलेलं नाही. तर भारताने मायदेशात बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे बांगलादेशची कानपूमध्ये खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे.
कानपूरमधील कामगिरी कशी?
भारतीय क्रिकेट संघाने 1952 पासून कानपूरमध्ये 23 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. मात्र भारताला कानपूरमध्ये फार सामन्यांमध्ये जिंकता आलं नाही. टीम इंडियाने 23 पैकी फक्त 7 सामनेच जिंकले आहेत. तर 3 वेळा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच भारताने 13 सामने अनिर्णित सोडवले आहेत. टीम इंडियाने कानपूरमध्ये अखेरचा सामना हा नोव्हेंबर 2021 साली खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान होतं. हा सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे आता टीम इंडिया कानपूरमध्ये बांगलादेशला पराभूत करत 8 वा सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.