Published on
:
11 Oct 2024, 4:54 am
Updated on
:
11 Oct 2024, 4:54 am
दीपेश सुराणा पुढारी प्रतिनिधी
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत १० ते २० टक्क्याने वाढ झाली होती. आता कोरोनाचा इफेक्ट तेवढा राहिला नाही. मात्र, वाढते ताणतणाव, धकाधकीचे आयुष्य, बदललेली जीवनशैली अशा विविध कारणांमुळे सुमारे १५ ते १६ टक्के तरुणांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी मांडले आहे.
सर्वेक्षणाची आकडेवारी काय ?
२०१७ मधील एका संशोधनानुसार, देशातील १५ टक्के नागरिक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. कोविड-१९ नंतर देशात मानसिक आजाराचा सामना करणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढल्याचे २०२० मधील इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
१० ते १९ वर्षे वयोगटातील १६ टक्के प्रमाण
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १६ टके प्रमाण हे १० ते १९ वर्षे वयोगटातील आहेत. सध्याच्या काळात अभ्यास, नोकरी, अस्थिर भविष्य, नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी तणाव,
बदलती जीवनशैली यासह अनेक कारणे मानसिक समस्यांसाठी कारणीभूत ठरत आहेत. सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचा यामध्ये समावेश आहे. त्याच वेळी, सर्वात चिंतेची बाव म्हणजे मानसिक समस्यांना सामोरे जाणार्या लोकांमध्ये मोठ्या संख्येने मुले आणि तरुण, प्रौढ आहेत.
देशात मानसिक आरोग्य सेवेबाबत सरकारी पातळीवरही बरेच प्रयत्न केले जात आहेत. सरकारी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
हा केंद्र सरकारने वर्ष १९८२ मध्ये जनतेला किमान मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये १० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण जाहीर करण्यात आले.
नैराश्य
चिंता विकार
उदासीनता
मनोविकार
स्व-आघातग्रस्त वर्तन
कोरोनानंतर मानसिक आजाराच्या रुग्ण संख्येत १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा इफेक्ट कमी झाला आहे. मानसिक आजारांबद्दल जागरुकता वाढली आहे. तथापि, मानसिक आजाराने पीडित असलेल्या तरुणांचे प्रमाण बरेच वाढले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ताणतणाव कमी करायला हवे. जीवनशैलीत बदल, सकारात्मक विचारांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्या.